Chitra Wagh : चित्रा वाघ यांचे अभिनेत्री रेणुका शहाणे यांना पत्र; पत्रात काय?

Chitra Wagh : चित्रा वाघ यांचे अभिनेत्री रेणुका शहाणे यांना पत्र; पत्रात काय?

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एक ट्विट केलं होते.
Published by :
Siddhi Naringrekar

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एक ट्विट केलं होते. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, मराठी "not welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका. ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका. कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे. असे लिहिलं होते. यावरुन अनेक प्रतिक्रिया आल्या.

याच पार्श्वभूमीवर आता चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणे यांना पत्र लिहिलं आहे. चित्रा वाघ यांनी पत्रात म्हटले आहे की, आम्ही सर्व आपले खुप मोठे चाहते आहोत, 'सुरभी' या कार्यक्रमातून आपण अखंड भारताच्या विविध भाषा, परंपरा, खाद्यसंस्कृती, वेशभूषा याचे घरबसल्या भ्रमण करविले आणि दर्शन घडवले. त्याचा आम्हाला अभिमान व कौतुकच आहे. भारतीय विविधतेला एका माळेत गुंफवून ठेवणारा धागा 'राष्ट्रीयत्वाचा' आहे, मला खात्री आहे, याची आपल्याला जाणिव असेलच. मराठी भाषा ही सदैव आमची मायबोली आहे. तीचा मान राखणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे.

यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, आपण ट्विट मधून मराठी मतदारांना केलेल्या आव्हानाची टायमिंग पाहता यामागील आपला राजकीय हेतू आहे का? हा संशोधनाचा विषय असू शकतो. असो, तसेच जर एखादा व्यक्ती मराठी असल्यामुळे त्याला घर व नोकरी नाकारली जात असेल तर त्याचा मी निषेधच करते. पण मी आपणास विचारू इच्छीते की आपण घाटकोपरमधील सोसायटीमधे स्वःत खात्री केली होती का? कारण माझ्या माहितीस्तव त्या सोसायटीत समान संख्येने मराठी परिवारही गुण्यागोविंदाने नांदतात. मी परत सांगते, मराठी भाषेचा आदर केला पाहिजेच पण तिचा वापर फक्त राजकीय हेतु करिता होता कामा नये. भाषा ही लोकांना जोडते. ती मराठी असो की राष्ट्रभाषा असो. हे तुमच्यापेक्षा कोण चांगल्या पद्धतीने सांगू शकते. कारण आपण जीवनसाथी निवडताना दुसऱ्या भाषेचा आदरच केला आहे.

आपणास एक प्रश्न विचारते की कोविडमधे पिपिई किट्स, बॉडी बॅग्स, मास्क, औषधे यात टक्केवारी खाल्ली आणि मराठी माणूस ऑक्सिजन अभावी मरत असताना करोडो रूपयांचे ऑक्सिजन प्लँट्स फक्त कागदावरच लूटून खाल्ले. तसेच आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात उर्दूभवन बांधण्यात अतिउत्साह दाखविला पण बीएमसीच्या अर्ध्या अधिक मराठी शाळांना टाळे लावले. अशा व्यक्तीच्या कृत्याचे तो फक्त मराठी आहे म्हणून आपण समर्थन करता का? नसल्यास त्याबाबत आपण उघड भूमिका केव्हा घेणार? आता त्याला राजकारणाचा भाग आहे म्हणून त्यावर आपण हेतुपुरस्सर मौन बाळगणार का? असे चित्रा वाघ म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com