CM Devendra Fadnavis On Virar Building Collapse : विरार इमारत दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू! मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत; इतक्या रक्कमेची केली घोषणा
विरारच्या नारंगी फाटा परिसरात मंगळवारी रात्री उशिरा एक गंभीर अपघात घडला. स्वामी समर्थ नगरमधील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील चौथ्या मजल्याचा भाग कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालेला आहे, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "विरारमध्ये एक इमारत कोसळून एक दुर्दैवी घटना घडली आहे, यात आतापर्यंत 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ व यंत्रणा काम करत आहेत. इमारतीला नोटीस, स्ट्रक्चरल ऑडिटची नोटीस देण्यात आलेली होती. लोकांनी ते गांभीर्याने घेतलं नाही, त्यांचीही समस्या होती. शासनाकडून 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तिथं मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आहेत. आता अनधिकृत बांधकाम होऊ नये यासाठी प्रयत्न करू. याविषयी अतिशय कडक भूमिका घेणार आहे".
या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे सांगतानाच मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. दरम्यान 48 तासांपासून एनडीआरएफच्या मदतीने हे बचाव कार्य राबवले जात आहे आणि ते पुढच्या काही तासात संपेल. आतापर्यंत 9 जणांना सुरक्षित वाचविण्यात आले आहे.