Eknath Shinde
Eknath Shinde

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं काँग्रेसवर शरसंधान; म्हणाले, "मोदींना हरवा म्हणून..."

"उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात ठरल्याप्रमाणे विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. पंचवार्षिकचं शेवटचं अधिवेशन आहे"
Published by :
Naresh Shende
Published on

Eknath Shinde Press Conference : उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात ठरल्याप्रमाणे विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. पंचवार्षिकचं शेवटचं अधिवेशन आहे. आम्हाला वाटलं चर्चा करतील. चर्चेतून जनतेसाठी खूप काही चांगलं होत असतं. परंतु, त्यांची चर्चा करण्याची इच्छा नाही. पत्रात नवीन मुद्दे नाही. सभागृहात चर्चा करण्याची आमची तयारी आहे. पण ते खोटं पण रेटून बोल असं करतात. लोकांची दिशाभूल करायची आणि स्वत:ची पाठ थोपटायची, अशी त्यांची अवस्था आहे. विरोधी पक्ष गोंधळलेला आहे. यावेळी ते माध्यमांसमोर छाती फुगवून आले असतील. कारण लोकसभेत मिळालेलं अपयश यामुळे आता सत्ताधारी पोकळ आश्वासनांच्या घोषणा करतील. हे कुणाचं अपयश आहे, मोदींना हरवा म्हणून तुम्ही जंग जंग पछाडलं. मोदी द्वेषाने पछाडले होते. संविधान बदलणार म्हणून खोटं नरेटिव्ह सेट केलं. आरक्षण जाणार हे म्हटलं. गावागावात जाऊन खोटं नरेटिव्ह पसरवलं. काही प्रमाणात तुम्हाला क्षणिक आनंद मिळाला. एव्हढं करुन सुद्धा काँग्रेसला १०० जागाच मिळाल्या, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली.

काँग्रेसवर टीका करताना शिंदे म्हणाले, आज पंधरा वर्ष तीन टर्ममध्ये त्यांना ४०,५० आणि ९९ जागा मिळाल्या. आता काँग्रेसला २४० पर्यंत पोहोचायला २५ वर्ष लागतील. एव्हढं करून काय मिळालं? मोदी प्रधानमंत्री झाले. देशातल्या लोकांनी त्यांना मतदान केलं. मोदी जिंकले आणि तुम्ही हरलात. तरीसुद्धा आमचे काही लोक दुसऱ्याच्या वरातीत नाचतात. किती मतं मिळाली त्यांना? उबाठा आणि आम्ही समोरासमोर १३ जागा लढलो. त्यापैकी ७ जागा आम्ही जिंकलो. एकूण मतांच्या साडेचौदा टक्के धनुष्यबाणाला मिळाली. साडेचार टक्के तुम्हाला मिळाली. आता त्यांना सूज आली आहे. ही सूज उतरेल.

तुम्ही फसवूण दिशाभूल करून मतं मिळवली आहेत. सरकार स्थापन झाल्यापासून पहिल्या दिवसापासून विरोधक म्हणत होते, हे सरकार पडेल. दोन-चार महिन्यांनी पडेल. पडता पडता सरकार मजबूत झालं आणि अजितदादा आमच्यासोबत आले. तुम्ही देव पाण्यात बुडवून ठेवले. पण काही झालं का? आता ३० तारखेला या सरकारला दोन वर्ष होत आहे. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. या सरकारने १५ हजार कोटी रुपये नुकसान भरपाईचे दिले. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सूर्य, चंद्र असेपर्यंत संविधान कुणीच बदलू शकत नाही. संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय मोदींनी घेतला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com