Eknath Shinde On Uddhav Thackeray
Eknath Shinde On Uddhav Thackeray

आमदार आमश्या पाडवींचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश, CM शिंदे म्हणाले,"आम्हाला कचरा म्हणणाऱ्यांचा..."

ज्यांच्याकडे शिवसैनिक नाही, त्यांच्या शिवसेना खरी कशी काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली.

नंदुरबारचे आमदार आमश्या पाडवी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. कार्यकर्त्यांच्या शिंदे गटात जाण्याच्या आग्रहामुळे आणि स्थानिक विकासकामांना गती मिळावी, यासाठी शिवसेनेत प्रवेश केला, असं पाडवी म्हणाले. यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. "शिवसेना धनुष्यबाण आपल्याकडे आहे, खरी शिवसेना आपल्याकडे आहे. अनेक लोक म्हणतात शिवसेना, धनुष्यबाण यांना मिळाला, हा चुकीचा निर्णय आहे. पण ज्यांच्याकडे शिवसैनिक नाही, त्यांच्या शिवसेना खरी कशी काय असू शकते, घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा मुख्यमंत्री मी नाही. जिथे आपत्ती आणि संकट येतं तिथे एकनाथ शिंदे धाऊन जाणारा व्यक्ती आहे. आम्हाला कचरा म्हणणाऱ्यांचा एकदा कचरा झाल्याशिवाय राहणार नाही, नियती कोणला सोडत नाही", असं म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला.

शिंदे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, शेकडो, हजारो, लाखो, कार्यकर्ते आपल्या सोबत येत आहेत.अनेक पदाधिकारी शिवसेनेत सामील झाले आहेत. बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेसोबत येत आहोत. लोकप्रिय आमदार आमश्या पाडवी यांचं मी मनापासून स्वागत करतो. आमश्या पाडवी आमचाच माणूस आहे. काही लोक म्हणत होते, एखाद दुसऱ्याचा कार्यक्रम करा, पण आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. आमश्याबद्ल कुणी असं बोललं नाही. ते बाळासाहेबांच्या विचारांच्यासोबत येत आहेत. २०१९ ला चुकीचा निर्णय कुणी घेतला, हे जनता दाखवत आहे. काँग्रेससोबत काम करण्यांसाठी आपण कसं काम करायचं. शिवसेना भाजप युती म्हणून आपण लढलो. २०१९ ला आपल्यासमोर एकच दरवाजा होता तो म्हणजे भाजप, लग्न एकासोबत आणि संसार दुसऱ्यासोबत, असं म्हणत शिंदे यांनी ठाकरेंवर तोफ डागली.

शिवसेनेचं आणि शिवसैनिकांचं खच्चीकरण होत होतं. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. लोकशाहीत एखाद्या प्रमुखाने चुकीचं पाऊल उचललं तर पक्षाच्या कार्यकर्त्यांना अन्यायाविरोधात जाण्याचे अधिकार असतात. बाळासाहेबच सांगायचे अन्यायविरुद्ध पेटून उठा, जेव्हा अती झालं तेव्हा आम्ही असा निर्णय घेतला. म्हणून त्यांच्या विचारांचं सरकार आणण्याचं आम्ही काम करतोय. बाळासाहेबांची शिवसेना कोणती हे सर्व जगाने पाहिलं. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी आम्ही सभा घेतोय, लोकांची तुंडुंब गर्दी असते, हजारो लोक आमच्या स्वागतासाठी येतात. आमचा निर्णय योग्य नसता तर आमश्या पाडवी आणि त्यांचे सहकारी आमच्यासोबत आले नसते.

शेतकऱ्यांसाठी आम्ही ४ हजार कोटींची तरतुद केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सर्व निर्णय बदलले. शेतकऱ्यांच्या योजनेसाठी युती सरकारने ४५ हजार कोटी रुपये खर्च केले. महिला बचत गटाला ताकद देणारं हे सरकार आहे. महिलांसाठी या सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. हे सरकार गोरगरिबांचं आहे. मी तुमच्यासारखाच कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मोदींनी केलेला विकास आपल्यासमोर आहे. ५० वर्षात जे जमलं नाही ते त्यांनी १० वर्षात करुन दाखवलं आहे. डबल इंजिनच्या सरकारने डबल फायद्याचं काम केलं आहे. अबकी बार ४५ पार, असाही विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com