"इंडियाच्या सभेत एक शब्द बंद झाला, माझ्या तमाम हिंदू बांधव आणि भगिनींनो", CM एकनाथ शिंदेचं उद्धव ठाकरेंवर शरसंधान
"उबाठाच्या लोकांनी तिथे जाऊन माफी मागायला पाहिजे होती. सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्यासोबत आम्हाला बसावं लागतंय. स्टॅलिन ज्यांनी सनातन हिंदू धर्माचा अपमान केला. त्यांच्यासोबत मला बसावं लागतंय. काल एक शब्द बंद झाला, माझ्या तमाम हिंदू बांधव आणि भगिनींनो. बाळासाहेबांचे विचार आणि धोरण त्यांनी सोडलं, म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. अबकी बार तडीपार, त्यांना महाराष्ट्राच्या जनतेनं दीड वर्षापूर्वी तडीपार केलंय, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली.
शिंदे पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, कालचा दिवसा हा काळा दिवस होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासमोर आणि बाळासाहेबांच्या समाधीसमोर ही सभा झाली. गेल्या ५० वर्षात जे झालं नाही, ते दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुन दाखवलं. मोदींनी २५ कोटी लोकांना दारिद्रयातून बाहेर काढलं. 'इंडिया' हा विश्वास गमावलेला विरोधी पक्ष. त्यांच्याकडे कोणताच अजेंडा नाही. फक्त मोदी द्वेष त्यांच्या भाषणातून दिसत होता. ज्या देशाला मोदींनी एवढ्या उंचावर घेऊन गेला, त्यांना २०१४ ला तुम्ही चौकीदार चोर म्हणालात. लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली आणि यावेळी जनतेनं असंच ठरवलं आहे. हे पंतप्रधानपदाचा उमेदवारही जाहीर करू शकत नाही, एक दुसऱ्याकडे पाहत बसतात.
दोन वर्षात महायुती सरकारने केलेली कामे आता जनतेसमोर आहेत. अडीच वर्षाचं जे सरकार होतं त्याला स्पीड ब्रेकर होतं. प्रकल्पांना त्या सरकारने अडथळे आणले. परंतु, आमचं सरकार आल्यावर प्रकल्पांना गती मिळाली. केंद्र आणि राज्य सरकार मिळून दोन वर्षात वेगाने निर्णय़ घेतले. बंद पडलेले प्रकल्प सुरु केले. नवीन प्रकल्पांना चालना दिली. राज्य सरकारने सर्व सामन्यांच्या हिताचे ५०० निर्णय घेतले आहे. या राज्यात सकारात्मकता आणण्याचा आमचा प्रयत्न होता, त्याला यश मिळालं. जे प्रकल्प आम्ही मार्गी लावले, त्यात मंत्रिमंडळातील सर्वांचच योगदान आहे. मी मुख्यमंत्री म्हणून समाधानी आहे, असंही शिंदे म्हणाले.
लोकांच्या मनात या सरकारबद्दल चांगली भावना निर्माण झाली आहे. याचा फायदा आम्हाला लोकसभेच्या निवणडुकांत नक्की होईल, आम्ही कुणाची उणीधुणी काढत नाहीत. आम्ही विकासाकडे लक्ष देतो. केंद्राकडून दोन वर्षात पूर्ण पाठबळ आम्हाला मिळालं. जवळपास ५ लाख कोटींची परदेशी गुंतवणूक आली आहे. याचा फायदा रोजगार निर्मीतीत होणार आहे. कालची सभा फॅमिली गॅदरिंग होती, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सगळे नैराश्य चेहऱ्यावर असलेले लोक, कुणी उत्तर प्रदेश,बिहारमधून तडीपार झालेले लोक काल आले. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं, की धरुन बांधून आणलेली ही लोक आहेत, असं म्हणत शिंदे यांनी इंडिया आघाडीवर टीका केली.