Eknath Shinde
Eknath Shinde

"महाविकास आघाडीच्या ३० जागा आल्या असल्या, तरी..."; CM एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

"काँग्रेसने बाबासाहेबांचा पराभव केला. बाबासाहेब म्हणाले होते, हे काँग्रेस जळकं घर आहे. यापासून दूर राहा"
Published by :
Naresh Shende
Published on

Eknath Shinde Speech : या राज्यात आपण सत्तांतर घडवलं. सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार आणलं. त्यावेळी नरेंद्र भोंडेकर एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून उभा होता. संघर्षाच्या काळाता आपल्यासोबत ५० लोक होते. आता त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. या निवडणुकांमध्ये फेक नरेटिव्ह पसरवले. संविधान बदलणार, आरक्षण जाणार, या आपल्या दलित, मागासवर्गीय भगिनींसमोर खोटा प्रचार करण्यात आला. आदिवासींमध्ये खोटा प्रचार केला. मुस्लिम लोकांमध्ये प्रचार केला. महाविकास आघाडीच्या ३० जागा आल्या असल्या, तरी मतदान महायुती आणि महाविकास आघाडीला एकसमान झालेलं आहे. त्यामुळे पाच विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवार पुढे आहे. एक मतदारसंघ आला आणि त्या मतदारसंघात चार ते पाच मतदारसंघाचा लीड तोडला गेला. हे काम खोटं नरेटिव्ह पसरवून केलं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीवर तोफ डागली आहे.

शिंदे पुढे म्हणाले, काँग्रेसने बाबासाहेबांचा पराभव केला. बाबासाहेब म्हणाले होते, हे काँग्रेस जळकं घर आहे. यापासून दूर राहा. हे बाबासाहेबांचे शब्द आहेत. नरेंद्र मोदी यांनी लंडनमधील बाबासाहेबांचं घर स्मारक म्हणून तयार केलं. नागपूरमधील दीक्षाभूमी आपण विकसीत करत आहोत. मुंबईच्या इंदूमीलमध्ये जगाला हेवा वाटावं असं स्मारक बनवत आहोत. ५०-६० वर्षे काँग्रेसला संविधानाची आठवण झाली नाही. पण नरेंद्र मोदी २०१४ ला सरकारमध्ये आले, त्यांनी २०१५ पासून संविधानदिन साजरा करायला सुरुवात केली. मोदींनी शपथ घेताना संविधान डोक्याला लावलं होतं. जोपर्यंत चंद्र, सूर्य राहील, बाबासाहेबांचं संविधान बदलणार नाही. खोट्या अफवा, खोटा प्रचार थांबवायला आम्ही कमी पडलो.

ही वस्तूस्थिती आहे. शिवसेना आणि उबाठाने १३ जागा समोरासमोर लढवल्या. परंतु, तुमच्या बाळासाहेबांच्या विचारांच्या धनुष्यबाणाच्या शिवसेनेनं १३ पैकी ७ जागा जिंकल्या. म्हणजे ६ जागा तुमच्याकडे आणि ७ जागा आमच्याकडे आल्या. शिवसेनेच्या १९ टक्के मतांपैकी धनुष्यबाणाच्या शिवसेनेकडे १४.५ टक्के मिळाली आहेत. धनुष्यबाणाला उबाठापेक्षा २ लाख मतं जास्त मिळाली आहेत. खोटं नरेटिव्ह पसरवून विजय मिळवला, ती एक सूज आहे. सूज कायम राहत नाही, सूज उतरते. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर टीका करत नाही. महाविकास आघाडी सरकारच्या कामावर दररोज टीका करते. मी म्हणालो, हा एकनाथ शिंदे तुमच्या टीकेला उत्तर देणार नाही. तर कामातून उत्तर देणार. आज हे उत्तर ५४७ कोटी रुपयांनी आपण दिलेलं आहे, असंही शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com