Eknath Shinde
Eknath Shinde

डोंबिवलीतील MIDC स्फोटाच्या घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी केलं मोठं विधान, म्हणाले; "अशा कंपन्यांना अंबरनाथ एमआयडीसीत..."

डोंबिवली एमआयडीसीत झालेल्या मोठ्या स्फोटाच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत मोठा निर्णय घेण्याची घोषणा केलीय.
Published by :

Eknath Shinde On Dombivali Blast Incident : एमआयडीसी अगोदर झाली आहे. कंपनी आधी झाल्या, त्यानंतर वसाहती झाल्या. अतिघातक रसायनांमुळे अशाप्रकारचे स्फोट होऊ शकतात, अशा कंपन्यांना अंबरनाथ एमआयडीसीत वेगळं सेक्टर करून कायमस्वरुपी शिफ्ट करण्याचा आम्ही निर्णय घेतोय. संबंधीत विभागाशी आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीच्या स्फोटाच्या घटनेबाबत पत्रकार परिषदेत दिली आहे.

एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, निवडणुका येतील आणि जातील, पण शेतकऱ्यांची कुठेही अडचण होता काम नये. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहणारं हे सरकार आहे. हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न संवेदनशीलपणे हाताळले जात आहेत. बियाणे आणि खतं मुबलक प्रमाणात आहेत. त्यामध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत. शासन स्तरावरून या गोष्टींना प्राधान्य देण्यात येणार आहे. बोगस बियाणांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये. बोगस बियाणांमधला काळाबाजार होता कामा नये. यासाठी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे कारवाई होईल. पावसाळ्यापूर्वीची कामे हाती घ्यायची आहेत.

अवकाळीमुळे काही ठिकाणी नुकसान झालं आहे. त्याचेही युद्धपातळीवर पंचनामे करायचे. त्यांना नुकसान भरपाई द्या. पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटतो. त्या गावांमध्ये औषधे, धान्यसाठा मुबलक प्रमाणात असला पाहिजे. साथीचे आजार होऊ नये, याची काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. वीज विभागालाही सूचना दिल्या आहेत. अवकाळी पावसामुळे जो वीजपुरवठा खंडीत होतो, वीजेच्या तारा तुटतात.

ते तात्काळ दुरुस्त करून वीज सप्लाय पूर्ववत करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. विनापरवाना होर्डिंग काढून टाका आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, त्यांच्यावर कठोर कारवाई करा. ज्यांच्याकडे परवाना आहे, त्यांच्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे. कारण अशा होर्डिंगही पडून दुर्घटना होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे आणि संबंधीतांवर कारवाई झाली पाहिजे, असंही शिंदे म्हणाले.

डोंबिवली एमआयडीसीत झाला मोठा स्फोट

डोंबिवलीच्या एमआयडीसीत एका कंपनीत मोठा स्फोट झाल्याची घटना घडलीय. एमआयडीसीच्या फेज- २ मध्ये हा स्फोट झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्फोटाची भीषणता इतकी गंभीर आहे की, आकाशात धुराचे लोट आणि आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. या स्फोटामुळे अनेक जण जखमी झाल्याचं समजते आहे. कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आलीय. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या स्फोटामुळे ७ जणांचा मृत्यू झाला असून ३५ कामगार जखमी झाले आहेत. ३८ कामगार जखमी झाले आहेत. यापैकी २४ जणांना एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ५ जण ऑरिंदम रुग्णालयात, तर नेपच्यून रुग्णालयात ९ जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com