Eknath Shinde
Eknath Shinde

महिलांना द्या इतका मान की वाढवू शकतील देशाची शान - एकनाथ शिंदे

जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमध्ये जनतेशी संवाद साधला.
Published by :
Team Lokshahi

राजकारण, समाजकारण, पत्रकार, पोलीस खातं, कला, क्रीडा, साहित्य, संगित अशा विविध क्षेत्रात महिला पाय रोवून उभ्या आहेत. अंतराळातही महिला आहेत. युद्धनौकेतही महिला आहेत आणि त्यांच्याकडे याची कमांड आहे. जगात कोणतही क्षेत्र असं नाही की तिथे महिला नाहीत. आता जमाना बदललाय. आता अबला नाही, सबला आहे. रणरागिनी आहेत. महिलांच्या नादी कुणी लागायचं नाही. महिलांना द्या इतका मान की त्या वाढवू शकतील देशाची शान, अशाप्रकारे महिलांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्तुतीसुमने उधळली. ते कोल्हापूर येथील महिला सशक्तीकरणाच्या कार्यक्रमात बोलत होते.

शिंदे यावेळी म्हणाले, एवढा मोठा महासागर आज महाशिवरात्रीला जमला आहे. शिवशक्ती जागर इथं झालेला आहे. ६०० पेक्षा जास्त महिला सदस्य उपस्थित आहेत, तसचे महिला सरपंचही आहेत. मी जनतेशी संवाद साधायला आलो आहे. जागतिक महिला दिनाच्या आणि महाशिवरात्रीच्याही तुम्हाला शुभेच्छा देतो. सावित्रीबाई फुले यांनी देशात शिक्षणाचा पाया रोवला. राज्यकारभारात जनसेवेत आदर्श निर्माण करुन अहिल्यादेळी होळकर यांनी इतिहास रचला. आपण त्यांचे वारसदार आहोत, याचा सार्थ अभिमान आपल्या सर्वांना आहे. या राज्यात महिला सुरक्षित राहाव्यात म्हणून महिला धोरण जाहीर केलं आहे, शहराशहरांत महिला सुरक्षा अभियान आपण सुरु करतोय. महिलांना कुठंही अडचण आली तर तातडीनं त्यांना मदत मिळाली पाहिजे. त्यांना संकटातून सोडलं पाहिजे. त्यांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकार अनेक उपक्रम करत आहेत.

महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक प्रकारच्या भूमिका यशस्वीपणे राबवतात. त्यांच्या कर्तृत्वामुळे राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीत महिलांचा हातभार लाभला आहे. या देशात महिला-पुरुष समानता आहे. त्यांना समानतेच्या वाटेवर आणण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुन दाखवलं. दिल्लीच्या नवीन संसद भवनात महिला आरक्षणाचं पहिलं विधेयक मंजूर झालं, ही हिंमत मोदींनी दाखवलं. उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून महिलांचं अश्रू पुसण्याचं काम केलं. महिलांच्या नावावर पक्की घरे केली, असंही शिंदे म्हणाले.

जनतेला संबोधित करताना शिंदे पुढे म्हणाले, प्रधानमंत्री मुद्रा योजना, महिला समृद्धी योजना सुरु करुन महिलांना बळ देण्याचं काम केलं. निर्भया कायद्यातून महिलांना सुरक्षेचं अभिवचनही दिलं. बेटी बचाव, बेटी पछाओ, सुकन्या सारख्या योजनाही सुरु केल्या. हे डबल इंजिनचं सरकार या राज्यात महिलांसाठी अनेक योजना आणत आहेत. राज्यातील दोन कोटी महिलांच्या आयुष्यात बदल घडवणारी ही महिला सशक्तीकरणाची क्रांती आहे. राज्यातील दोन कोटी महिलांच्या आयुष्यातील ही महिला सशक्तीकरणाची योजना आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com