"मुंबई-ठाण्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये वाघाची डरकाळी फुटली"; पदाधिकारी मेळाव्यात CM शिंदेंचं मोठं विधान
Eknath Shinde On Uddhav Thackeray : मुंबई ठाण्यानंतर वाघाची डरकाळी कुठे फुटली असेल, तर ती संभाजीनगरमध्ये. बाळासाहेबांनी संभाजीनगरवर प्रेम केलं. मी नगरविकास मंत्री होतो, त्यावेळी संभाजीनगरला मी निधी दिला. येथील पाणी पुरवठा योजनेचे महापालिकेचे १६८० रुपये राज्य सरकार भरेल. आम्ही खरी शिवसेना आहोत. नकली शिवसेना तिकडे आहे. मोदींनीही सांगितलं, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, ती नकली शिवसेना आहे. काँग्रेससोबत सरकार स्थापन करायला नको होतं, पण त्यांनी शिवसैनिकांचं खच्चीकरण करून काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. म्हणून धाडस करून सरकार बदलण्याचा निर्णय आम्ही घेतला, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, मी मंत्रिपदाला ठोकर मारली. पुढे काय होणार हे मला माहित नव्हतं. पण लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. कारण मी त्यांच्या सुख दु:खात धावून जात होतो. कुणी अडचणीत आलं तर त्याच्यासोबत उभं राहणं आपलं काम आहे. हे आधीच्या मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे होतं. पण जे झालं ते अतिशय चांगंलं झालं. न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर हे नाव कायम केलं. अडीच वर्षात त्या सरकारला ठराव करता आला नाही.
जेव्हा मी गुवाहाटीला गेलो, तेव्हा तुमच्याकडे १५ आमदार होते आणि आमच्याकडे ५० आमदार होते. आमचं सरकार आल्यानंतर नामांतराच्या विषयाचा रितसर ठराव केला आणि न्यायालयाने आमच्या बाजूनं निकाल दिला. पण अडीच वर्षात त्या सरकारला ठरावाबाबत काही सूचलं नाही. आज आपण छत्रपती संभाजीनगर हे नाव उघडपणे बोलू शकतो, याचा मला अभिमान आहे.
हेमंत करकरे शहीद झाले. त्यांचा या लोकांनी अपमान केला. तुकाराम ओंबळे यांनी कसाबच्या सर्व गोळ्या पोटात घेतल्या. पण त्यांनी कसाबला सोडला नाही. फारुक अब्दुल्ला म्हणतो, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. पाकिस्तानने बांगड्या भरल्या नाहीत. हा देशद्रोह आहे, अशा लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का? म्हणून ही निवडणूक आता खूप महत्त्वाची आहे, असंही शिंदे म्हणाले.