महायुतीचं सरकार दोन-तीन महिन्यात पडेल म्हणणाऱ्यांचा CM शिंदेंनी घेतला समाचार, म्हणाले; "आता २०० आमदार..."
CM Eknath Shinde Press Conference : आमचं महायुतीचं सरकार येण्याआधी अडीच वर्ष पूर्ण कारभार बंद होता. सर्व काही ठप्प होतं. सर्व कामांना स्पीड ब्रेकर होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि मी कामाला सुरुवात केली. युती म्हणून काम सुरु झालं आणि प्रकल्प सुरु झाले. योजना सुरु झाल्या. त्यानंतर अजित पवारांनी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास आमच्या सरकारला पाठिंबा दिला. राज्यात शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगार, महिलांसाठी, तरुणांसाठी, ज्येष्ठांसाठी जे निर्णय घेतले, तेव्हढे निर्णय आतापर्यंतच्या इतिहासात घेतले नव्हते. आमचं सरकार स्थापन झाल्यावर दोन-तीन महिन्यात सरकार पडेल, असं म्हणत होते. परंतु, सरकार अधिक मजबूत होत गेलं. आता २०० आमदारांचं सरकार आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिंदे पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, विरोधकांकडे आरोप-प्रत्यारोपांशिवाय दुसरं काहीही नाही. आमच्याकडे काम आहे. दहा वर्षात मोदींनी या देशाचा विकास केला. देशाला महासत्तेकडे नेण्याचा निर्धार केला. जी-२० सारखी परिषद मिळाली. भारताने या परिषदेचं अध्यक्षपदही भूषवलं. मोदींनी भारताचा जगात नावलौकीक केला. आता भारत बोलतो आणि जग ऐकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे आणि या देशात ४०० पारचा आकडा पार करायचा आहे. या राज्यातील ४५ च्या वर खासदार निवडून आणायचे आहेत. हेमंत आप्पा गोडसेही विजयी होती, असा विश्वास मी व्यक्त करतो.
साधू-संतांच्या भेटीत काय चर्चा झाली, यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, हेमंत आप्पा गोडसे यांना आशीर्वाद द्यायला साधू-संत स्वत:हून आले होते. ते म्हणाले, आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत. पालघरमध्ये झालेलं साधू हत्याकांड त्यांनी सांगितलं. या प्रकरणाची केस ज्या पद्धतीने चालवायला पाहिजे होती, तसं झालं नाही. दुर्देवाने सरकारने यात लक्ष घातलं नाही. पण मी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या कुटुंबाच्या पाठिशी उभं राहण्याचं काम आम्ही केलं. हेमंत आप्पा गोडसेंसह राज्यातील जेव्हढे महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांनी आमची साधू-संतांची, वारकऱ्यांच्या आघाडीचा पाठिंबा असेल, असं ते म्हणाले.
येत्या २० तारखेला लोकसभेची निवडणूक होत आहे. या लोकसभेच्या निवडणुकीसाठी हेमंत गोडसे यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे. त्याचा प्रचार जोरात सुरु आहे. महायुती अतिशय ताकदीने एकजुटीने काम करत आहे. महायुतीचे सर्व पदाधिकारी आपापल्या मतदारसंघांत काम करत आहेत. छत्रपती संभाजी नगर हे नाव आपण दिलं होतं, त्या नावाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने ती याचिका फेटाळली आणि छत्रपती संभाजीनगर या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. धाराशिवच्या नावावरही अशाचप्रकारे शिक्कामोर्तब केला आहे. ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. गेल्या दोन वर्षात महायुतीने केलेलं काम सर्वांसमोर आहे, असंही शिंदे म्हणाले.