"तो क्षण पाहिल्यानंतर आमच्या सर्वांच्या पोटात धडकी..."; विधानभवनात खेळाडूंचा सत्कार करताना CM शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
CM Eknath Shinde On Team India : विश्वविजेत्या भारतीय संघाचं मी अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. इथे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे आहे, या सर्वांचं मी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. १७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकला. जेव्हा पाकिस्तानचा पराभव केला तेव्हा आपण अर्धा वर्ल्डकप जिंकलाच होता. मागील आठवड्यापासून देशभरात जल्लोष होत आहे. प्रधानमंत्री महोदयांनीही त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. देशाचा गौरव झाला, या भावनेनं सर्वजण भारतीय संघाचं स्वागत करत होते. काल आपण जो काही जल्लोष पाहिला, अरबी समुद्राच्या बाजूला या मुंबईकरांचा महासागर उसळला होता. ते चित्र पाहिल्यानंतर आमच्या सर्वांच्या पोटात धडकी भरली होती. खेळाडूंचं स्वागत करायला इतक्या मोठ्या संख्येत मुंबईकर रस्त्यावर येतील, असं कुणालाच वाटलं नव्हतं, असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात केलं.
शिंदे पुढे म्हणाले, मी या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मुंबई पोलिसांचं अभिनंदन करतो. मुंबईच्या पोलिसांना अशाप्रकारची गर्दी हाताळायची सवय आहे. क्रिकेटमध्ये भारत विश्वगुरु असल्याचं कालच्या विजयाने सिद्ध केलं आहे. प्रत्येक भारतीयाचं देशाप्रती आणि क्रिकेटवर असलेलं प्रेम पाहायला मिळालं. इकडे समुद्र, तिकडे सागर आणि इथे माणसांचा जनसागर फुलला होता. मुंबई क्रिकेटची पंढरी आहे. पंढरीच्या विठूरायाचं दर्शन घेण्यासाठी वारकरी पंढरपूरच्या दिशेनं निघाले आहेत. तसेच क्रिकेटप्रेमी वारकरी काल मुंबईकडे निघाले होते. हे देखील चित्र आपण पाहिलं. खरं म्हणजे साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा असं आपण म्हणतो. तसाच दिवाळी दसरा काल मुंबईकरांनी साजरा केला. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष घुमला.
भारत माता की जयचा जयघोष घुमला. या टीम इंडियात चार मुंबईकर खेळाडू होते, याचा आपल्याला विशेष अभिमान आहे. आपल्या भारताच्या विजयाचे शिल्पकार कर्णधार रोहत शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चारही खेळाडूंचे मी स्वागत करतो. टी-२० च्या या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही, भारतानं ऐतिहासिक कामगिरी केली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
एका क्षणी वाटतं होतं, की सामना आपण गमावतोय की काय, पण खेळाडूंनी कारमध्ये मला सांगितलं, की प्रत्येकाला आत्मविश्वास होता की, हा वर्ल्डकप आम्ही जिंकणार. त्याच आत्मविश्वासाने आम्हाला हा वर्ल्डकप जिंकवून दिला. मी या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मुंबई पोलिसांचं अभिनंदन करतो. मुंबईच्या पोलिसांना अशाप्रकारची गर्दी हाताळायची सवय आहे. क्रिकेटमध्ये भारत विश्वगुरु असल्याचं कालच्या विजयाने सिद्ध केलं आहे. प्रत्येक भारतीयाचं देश आणि क्रिकेटवरचं प्रेम पाहायला मिळालं.