Eknath Shinde On Uddhav Thackeray
Eknath Shinde On Uddhav Thackeray

"पंतप्रधान मोदींना औरंगजेब म्हणणाऱ्यांचा महाराष्ट्राची जनता सूड घेईल", CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धारेवर धरलं आहे.
Published by :

उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्याच्या सभेत भाजप औरंगजेबाची वृत्ती असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापलं. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर सडकून टीका करत पलटवार केला आहे. मोदी साहेबांनी या देशाला नवी उंची दिली. बाळासाहेबांचं राम मंदिर बांधण्याचं आणि ३७० कलम हटवण्याचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं. अशा पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं म्हणजे या देशाचा अपमान आहे. मोदींना ओरंगजेबाची उपमा देणं हा देशद्रोह आहे. महाराष्ट्राची जनता मतपेटीच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर देईल आणि मोदींच्या अपमानाचा सूड घेईल, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. ते महायुतीच्या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले, मोदी साहेबांना महाराष्ट्रातून ४५ पेक्षा जास्त जागा मिळाल्या पाहिजेत आणि त्यांचे हात बळकट झाले पाहिजे. या आढावा बैठकीत सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांसोबत बैठक झाली. या जागा जिंकण्यासाठी एक रणनीती असेल आणि आढावा घेण्यासाठी ही बैठक होती. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मोदींच्या मार्गदर्शनाखाली ३७० कलम हटवलं. जे स्वप्नवत वाटतं होतं ते त्यांनी करुन दाखवलं. देशभक्तीता परिचय त्यांनी दिलाय. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचा निषेध केला पाहिजे. राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे, योग्यवेळी योग्य निर्णय होईल.

मोदींचं आणि सरकारचं काम पाहून अनेक लोक महायुतीसोबत येत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी उत्तरप्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त ४८ जागा आहेत. यापैकी ४५ जागांवर महायुतीला विजय निश्चित करायचा आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्राचं मोठं योगदान हवं आहे, यासाठी या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना महायुतीला सपोर्ट करुन या जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करणार. सावकरांचा अपमान करणाऱ्यांना पाठिशी घालणं आणि त्यांना शिवाजी पार्कमध्ये आणणं म्हणजेच, हा काळा दिवस होता. इंडिया आघाडी पूर्णपणे तुटलेली आहे. मोदींवर टीका करणं हाच त्यांचा उद्देश आहे. या लोकांना महाराष्ट्राची जनता योग्य वेळी उत्तर देईल आणि या लोकांना घरात घरातच बसवतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com