Coastal Road : पाच वर्षांपासून सुरु असलेला वाद अखेर मिटला; वरळीतील समुद्रात दोन खांबांमधील अंतर 120 मीटर ठेवण्याचा निर्णय
अखेर पाच वर्षांनी बीएमसी आणि मच्छिमारांमधील वाद मिटला आहे. मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पातील खांबांमधील अंतरावरुन महापालिका आणि वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांमध्ये हा वाद सुरु होता. कोस्टल रोड प्रकल्पात वरळी इथल्या समुद्रात दोन खांबांमधील अंतर 60 मीटर ठेवण्यात आलं होतं. वरळी-कोळीवाडा इथल्या क्लिव्हलँड जेट्टीमधून मच्छिमारांच्या शेकडो बोटी दररोज मासेमारीसाठी समुद्रात जातात. खांबांमधील कमी अंतरामुळे या बोटींचे अपघात होण्याची भीती व्यक्त करत मच्छिमारांनी हे अंतर 200 मीटर ठेवण्याची मागणी केली होती.
कोस्टल रोड प्रकल्पात एकूण 11 खांबांचे बांधकाम होणार आहे. 5 खांबांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर 7 पासून पुढे होणाऱ्या खांबांच्या कामांमध्ये क्रमांक आठ हा खांब कमी करुन 7 ते 9 या दोन खांबांमधील अंतर 120 मीटर असेल.
याच पार्श्वभूमीवर आता मच्छिमार बोटींचे अपघात टाळण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्पातील वरळी इथल्या समुद्रामधील 7 ते 9 या तीन खांबांमधील क्रमांक 8 हा खांब रद्द करुन दोन खांबांमधील अंतर 120 मीटर ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे.गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या चर्चा, बैठकांनंतर अखेर हे अंतर 120 मीटर ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून पत्राद्वारे मच्छिमार संघटनांना कळवण्यात आले आहे.