Cold Wave : राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला
नव्या वर्षात हवामानात सातत्याने बदल होत असून राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. कधी थंड वाऱ्यांमुळे मुंबई-पुण्यात गारवा, तर कधी पहाटे धुक्याची चादर दिसत असून काही ठिकाणी हवा बिघडल्याचे चित्र आहे. १० जानेवारी रोजी राज्यात पावसाचा कोणताही धोका नसला, तरी सकाळी आणि रात्री थंडीचा कडाका कायम राहणार आहे. विशेषतः मुंबई, पुणे आणि आसपासच्या भागांत हवामान कोरडे असले गारठा वाढला आहे.
आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीत आहे. सकाळच्या वेळेत काही भागांत धुके दिसून येऊ शकते. मुंबई आणि उपनगरांत कमाल तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, तर किमान तापमान 19 ते 21 अंशांच्या आसपास असण्याचा अंदाज आहे. समुद्राच्या प्रभावामुळे थंडीचा कडाका जाणवणार नाही, मात्र पहाटे गार हवा आणि हलका गारठा अनुभवायला मिळेल. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही अशीच हवामानस्थिती राहणार आहे.
पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागात सकाळी धुक्याची शक्यता असून, दिवसभर आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील. 28 ते 30 अंश सेल्सिअसपर्यंत पुण्यात कमाल तापमान जाण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 12 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर परिसरातही पहाटे गारवा जाणवेल. दिवसा सूर्यप्रकाशामुळे तापमान वाढेल, त्यामुळे थंडी आणि उबदार हवामान अनुभवायला मिळणार आहे.
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव तुलनेने अधिक राहणार आहे. 10 ते 13 अंश सेल्सिअसपर्यंत नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर भागात किमान तापमान घसरण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत कोरडे हवामान राहील, मात्र सकाळी धुके आणि रात्री गारठा जाणवेल. विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा आणि चंद्रपूर भागात थंडीचा कडाका कायम असून किमान तापमान 10 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
एकंदरीत, पुढील काही दिवस राज्यातील हवामानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. सकाळच्या वेळी धुके आणि रात्री गारवा जाणवत राहील, तर दिवसा सूर्यप्रकाशामुळे तापमानात किंचित वाढ दिसून येईल. मुंबई–पुण्यासह राज्यातील बहुतांश भागांत थंडीचा प्रभाव कायम राहणार असून, किमान तापमानात मोठी घसरण होण्याची चिन्हे नाहीत. हवामान स्थिर राहण्याचा अंदाज असून, हिवाळ्याची सौम्य थंडी नागरिकांना अनुभवायला मिळेल.
