"खोक्याच्या माध्यमातून सत्तेत येणं, हाच महाराष्ट्रासाठी काळा दिवस", नाना पटोलेंचा महायुती सरकारवर घणाघात
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप सोहळा दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कमध्ये पार पडणार आहे. तत्पूर्वी, महायुतीच्या नेत्यांनी इंडिया आघाडीवर टीकेची झोड उठवली आहे. इंडिया आघाडीची सभा म्हणजे राज्यासाठी काळा दिवस, अशाप्रकारची जहरी टीका विरोधक इंडिया आघाडीवर करत आहेत. परंतु, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना पलटवार केला आहे. खोक्याच्या सरकारच्या माध्यमातून सत्तेत येणं. हाच महाराष्ट्रासाठी काळा दिवस होता. महाराष्ट्र बेईमानांचं राज्य नाही, इमानदारांचं आहे, असं म्हणत पटोलेंनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे.
पटोले माध्यमांशी बोलताना म्हणाले, खोक्याच्या सरकारच्या माध्यमातून सत्तेत येणं. हाच महाराष्ट्रासाठी काळा दिवस होता. देशाच्या संविधानचं रक्षण करणारी सर्व व्यवस्था याठिकाणी उभी आहे. याला जर काळा दिवस म्हणत असतील, तर मोदी सरकारची भ्रष्टाचारी जनता दिल्लीत बसल्याचं सुप्रीम कोर्टानं निदर्शनात आणून दिलं आहे.
दरम्यान, आज होणाऱ्या इंडिया आघाडीच्या जाहीर सभेत राहुल गांधी महायुती सरकारला कोणत्या मुद्द्यांवरून धारेवर धरतात, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे. तसंच शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीची लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती काय असेल, यावर भाष्य करतात की नाही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.