दिल्ली डायरी : 'नुपूर शर्माप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने लक्ष्मणरेषेचे उल्लंघन केले'
प्रेषितांविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मावर सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच ताशेरे ओढले होते. यावर टीका करताना १५ निवृत्त न्यायाधीश, सनदी सेवेतील ७७ निवृत्त अधिकारी आणि २५ अन्य नागरिकांनी खुले पत्र लिहीत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी ‘लक्ष्मणरेषे’चे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नूपुर शर्माच्या प्रेषितांवरील वादग्रस्त वक्तव्यावर म्हटले होते की, शर्मा यांच्या बेलगाम वक्तव्यांनी अवघ्या देशात हिंसात्मक आग भडकली असून देशातील सद्य:स्थितीला त्या जबाबदार आहेत. यावर टीका करताना पत्रात लिहीले की, सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांच्याकडून आलेल्या टिप्पण्या दुर्देवी आहेत. त्यामुळे आम्हाला नाइलाजाने हे निवेदन प्रसृत करावे लागत आहे. हे ताशेरे दुर्भाग्यपूर्ण आणि अनपेक्षित आहेत. त्यामुळे देश-विदेशातील नागरिकांना धक्का बसला आहे. याप्रकारच्या अपमानजनक भूमिकेला न्यायव्यवस्थेच्या इतिहासात कसलेही स्थान नाही.
आरसीपी सिंह करणार भाजपात प्रवेश
हैदराबाद येथे झालेल्या पक्षाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाजप कार्यकर्त्यांकडून केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांचे स्वागत करतानाच्या फोटोमुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा झाल्या आहेत. त्यामुळे जेडीयूचे नेते भाजपात सामील झाले की काय, अशी अटकळ बांधण्यास सुरू झाली आहे. सिंग मंत्री असतानाही त्यांना राज्यसभेवर पुन्हा उमेदवारी देण्यास पक्षाने नकार दिल्यामुळे ते जेडीयुवर नाराज असल्याचे समजत आहे. त्याचा सहा वर्षांचा राज्यासभेचा कार्यकाळ 7 जुलै रोजी संपत आहे.
अनधिकृत बांधकामांवर योगींचा हातोडा
पाटणा येथे रविवारी कथित बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझरने कारवाई करण्यात आली. या कारवाईत जिल्हा प्रशासनाने शहरातील राजीव नगर भागातील 75 घरे पाडण्यासाठी 17 बुलडोझर आणि 2 हजार पोलिस तैनात केले होते. परंतु, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यांमध्ये मुस्लिमांच्या मालकीच्या मालमत्तेवर अशी कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. राजीव नगर हा मुख्यतः हिंदूबहुल भाग आहे. हा भाग भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. हा भाग दिघा विधानसभा जागेचा भाग असून येथून २०२० च्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार संजीव चौरसिया यांनी ४७,००० हून अधिक मतांनी विजय मिळवला होता.
टीआरएस-भाजपच्या लढाईने घेतला भाषिक रंग
मागील दोन दिवसांपासून पोस्टर्सवरून सुरू असलेल्या टीआरएस-भाजपच्या लढ्याने आता भाषिक रंग घेतला आहे. याप्रकरणी टीआरएसने भाजपवर ट्विटरवरुन टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लक्ष वेधण्यासाठी टीआरएसने गुजराती भाषेचा अवलंब केला आहे. तर भाजपने उर्दुमधून प्रतिउत्तर दिले आहे.
अलिकडच्या काही महिन्यांत दोन्ही पक्षांमध्ये सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे, परंतु एकमेकांना लक्ष्य करण्यासाठी भिन्न भाषा वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे. टीआरएसने आपल्या अधिकृत हँडलवरून पीएम मोदींसाठी गुजरातीमध्ये 8 प्रश्न पोस्ट केले आणि ही भाषा पीएम मोदी यांना उत्तम समजते, असे त्यांनी म्हंटले आहे. यावर पलटवार करताना भाजपने उर्दु भाषेची निवड केली असून टीआरएस सरकारचे अपयश मांडण्यात आले. यात शेतकरी आत्महत्या, सोनेरी तेलंगणाचे अधुरे स्वप्न आणि कर्जाचा मुद्दा आहे.