Ajit Pawar
Ajit Pawar

"त्या पदावरून शरद पवार बाजूला गेले आणि..." बारामतीच्या सभेत अजित पवारांनी सांगितला मोठा किस्सा

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांच्या आठवणींना उजाळा दिला, ते बारामतीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
Published by :

तिसऱ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी महायुतीचे सर्वच घटकपक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते सहकार्य करत आहेत. काही भागात भावनिक मुद्दा करण्याचा प्रयत्न होत आहे. ही भावनिक निवडणूक नाही. ज्या दिवसापासून पवार साहेबांनी निवडणुकीला सुरुवात केली, जोपर्यंत पवार साहेब उभे होते, तोपर्यंत बारामतीकरांनी प्रचंड मतदान केलं. माढानेही त्यांना मतदान केलं. ते म्हणाले, मी आता लोकसभेला राहणार नाही. मी राज्यसभेत जाईल आणि ते राज्यसभेत गेले. त्यांनी तो निर्णय स्वत: घेतला. त्यांनी पूर्वी सांगितलं होतं, मी आता त्या पदावरून थोडसं बाजूला जातो. तुम्ही सर्वांनी पक्ष आणि संघटना बघा आणि ती संघटना पुढं न्या, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. ते बारामतीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

पवार साहेबांनी सांगितलेल्या निर्णयाला अजित पवार, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, संजय बनसोडे, बाबा आत्राम अशा अनेकांनी होकार दिला. परंतु, नंतर काही घटना घडल्या. कुणी काय निर्णय घ्यावा, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यांनी सांगितलं तसं मी वागत आलो. कुठंही मी कमी पडलो नाही. मी सर्व जबाबदारी पार पाडायचो. आताच्या काळाच संपूर्ण राजकीय चित्र बदललं आहे. माझ्या बारामतीसमोर, लोकसभेपुढं, माझ्या राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. केंद्रात सत्ता येणार आहे. आपण त्यांच्या विचाराचा खासदार दिला नाही, तर कामं होणार नाहीत, असंही पवार म्हणाले.

संपूर्ण देशात निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अनेक निवडणुकीच्या निमित्ताने आपण ऐकमेकांना भेटलो आहोत. माझी राजकारणाची सुरुवात झाली, तेव्हा बाजार समिती, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, आमदारकी, खासदारकी अशा खूप निवडणुकीच्या निमित्ताने आपण ऐकमेकांना भेटत आलो आहोत. तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर माझ्यावर असलेली जबाबदारी आता वाढलीय.

तुमच्या सर्वांचं सहकार्य आणि आशीर्वाद पाठिशी असल्याने मी राज्याच्या राजकारणात काम करु लागलो. जे काही पवार साहेब सांगतील ते ऐकत होतो. १९९१ पासून खासदारकीला सुरुवात केली. तेव्हापासून मी राजकारण सुरु ठेवलं. परंतु, नंतरच्या काळात काही अशा राजकीय घटना घडल्या, ही गावकी-भावकीची निवडणूक नाहीय, ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे.

१४० कोटी जनतेचा कारभार कोणता नेता पुढे नेऊ शकतो, यासाठी ही निवडणूक आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात आम्ही वेगवेगळ्या प्रकारचा निधी आणला. रस्ते, शेतीसाठी पाणी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटेल, नवीन उद्योग कसे येतील, आपल्याकडे रोजगार कसा निर्माण होईल, छोटे मोठे उद्योजक कसे तयार होतील आणि चांगल्या प्रकारची शेतीवाडी कशी करता येईल, यासाठी माझा प्रयत्न आहे.

पूर्वीच्या काळात मला माझा तालुका आणि जिल्ह्याचं काम पाहावं लागत होतं. आता राज्यही बघावं लागतं आणि देशपातळीवर बैठका लागल्या तर दिल्लीलाही जावं लागतं. पूर्वी माझा तुमच्याशी तितका संपर्क राहिला नाही. पण प्रत्येक आठवड्याला बारामतीत कार्यकर्त्यांशी चर्चा करून लोकांच्या समस्या सोडवण्याबाबत बैठकांचं केलं जातं.

सरपंचांनी लोकांच्या समस्यांबाबत अनेक पत्रक मला दिले आहेत. मी गेले अनेक वर्ष तुमची कामे करत आहे. सातवेळा तुम्ही मला निवडून दिलं आहे. एकदा खासदार आणि सातवेळा आमदार म्हणून तुम्ही मला संधी दिली. महाराष्ट्रात इतर तालुक्याच्या तुलनेत तुम्हाला जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला. महायुतीत आम्ही मिळून ४८ जागा उभ्या केल्या आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान झालं आहे.

त्यानंतर ७ तारखेला तिसऱ्या टप्प्यातील मतदान आहे. नंतर पुणे, शिरुर, मावळ या चौथ्या टप्प्यातील मतदान होईल. मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातलं पाचव्या टप्प्यातलं मतदान संपेल. त्यानंतर सहावा आणि सातवा टप्पा देशातील इतर राज्यात होणार आहे, असंही अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com