Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

"मला सरकारमधून मोकळं करावं ही नेतृत्त्वाला विनंती"; उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची फडणवीसांची इच्छा, पत्रकार परिषदेत म्हणाले...

लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल काल मंगळवारी जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ सुरु झाली आहे.
Published by :

Devendra Fadnavis Press Conference : लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल काल मंगळवारी जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ सुरु झाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मला सरकारमधून मोकळं करावं ही नेतृत्त्वाला विनंती आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याच्या फडणवीसांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले, ओडिसात पहिल्यांदाच भाजपच्या नेतृत्त्वात आमचं सरकार आलं आहे. आंध्रप्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्त्वात एनडीएच्या सरकारला मतदारांनी पसंती दिली. अरुणाचलमध्ये भाजपचं सरकार पुन्हा निवडून आलं. विधानसभा निवडणुकीतही जनतेनं एनडीए आणि भाजपला मोठा कौल दिला आहे. जेव्हढ्या जागा एनडीए आघाडीला मिळाल्या आहेत. त्यापेक्षा जास्त जागा एकट्या भाजपला देशात मिळाल्या आहेत. भाजप त्यांच्यापेक्षा मोठा पक्ष राहिला आहे. भाजप आणि एनडीएचे घटक पक्ष मिळून सरकार स्थापन होणार आहे. महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. आमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा आम्हाला महाराष्ट्रात मिळाल्या आहेत.

संविधान बदलला असा संदेश आमच्याविरोधात पसरवण्यात आला होता. ज्या प्रमाणात हे आम्ही थांबवायला पाहिजे होतं, ते आम्ही करू शकलो नाही. हे देखील खरं आहे. जनतेनं आम्हाला जो जनादेश दिला आहे, त्याला मानून पुढची तयारी करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. ज्यांना जास्त जागा मिळाल्या आहेत, त्यांचंही मी आभार मानतो. निवडणुकीत अर्थमॅटिक असंत, यात कुठेतरी आम्ही पराजीत झालो. याच्या बऱ्याच मिमांसा असू शकतात. महाराष्ट्रात मविआला एकूण ३० जागा मिळाल्या. त्यांना मिळालेलं मतदान ४३.९१ टक्के आहे.

आम्हाला ४३.६० टक्के मतदान आहे. म्हणजे अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी फरक आहे. १७ आणि ३० असे आकडे आहेत. मविआला २ कोटी ५० लाख मतं मिळाली आहेत आणि महायुतीला २ कोटी ४८ लाख मतं मिळाली. तर २ लाख ३ हजार १९२ मते त्यांना जास्त मिळाली आहेत. मुंबईत मविआला ४ आणि आम्हाला २ जागा मिळाल्या आहेत. मविआला मुंबईत २४ लाख ६२ हजार मते आहेत आणि महायुतीला २६ लाख ६७ हजार मते आहेत. म्हणजे मुंबईत आम्हाला मविआपेक्षा २ लाख मतं जास्त मिळाली आहेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com