सांगली-कोल्हापूरात पूर नियंत्रणासाठी नवीन साठवण तलाव बांधण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये दरवर्षी येणाऱ्या पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘मित्र’ संस्थेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत जागतिक बँकेच्या सहकार्याने लघु पाटबंधारे प्रकल्पांचे खोलीकरण व नव्या साठवण तलावांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस उपमुख्यमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार राणा जगजीतसिंह, मुख्यमंत्री यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी, मुख्य सचिव सुजाता सौनिक, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर होण्यासाठी आवश्यक धोरणे तयार करण्यासाठी उपाययोजना संदर्भात श्री. परदेशी यांनी यावेळी सादरीकरण केले.मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हास्तरावर विशिष्ट धोरणे राबविणे गरजेचे आहे. यासाठी स्टेट डेटा पॉलिसीच्या आधारे जिल्हावार साधन सामग्री तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीत राज्यातील विविध प्रकल्पांचे पुनरावलोकनही करण्यात आले. तसेच केंद्र सरकारकडे सादर करावयाच्या प्राथमिक प्रकल्प अहवालासाठी आवश्यक कार्यपद्धती (SOP)ला मान्यता देण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी सहकार्य - शासकीय यंत्रणेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर वाढवण्यासाठी ‘मित्र’ संस्थेने युनिव्हर्सल एआय विद्यापीठ, IIT मुंबई आणि WoRGpedia या संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत. यामुळे सरकारी कामकाज अधिक कार्यक्षम आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.