Devendra Fadnavis : भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांचे फडणवीसांविषयी 'ते' विधान चर्चेत
लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठी झेप घेत स्पष्ट बहुमत प्राप्त केले. तर महाविकास आघाडी केवळ सुमारे ५० जागांवर थांबली. सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारला आता एक वर्ष पूर्ण झाले असून या पार्श्वभूमीवर भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी केलेले विधान राजकीय वर्तुळात चर्चेचे केंद्र बनले आहे.
लोढा यांनी नेमके काय म्हटले?
लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत म्हटले की,“फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत. महाराष्ट्रातील सर्वात तरुण महापौर म्हणून सुरुवात करून, पक्ष मजबूत स्थितीत नसतानाही त्यांनी तीन वेळा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला.”
याचबरोबर त्यांनी पुढे म्हटले,“भाजप स्वतःच्या बळावर चालणारा पक्ष आहेच; पण राज्यातील अनेक इतर राजकीय पक्ष सुद्धा फडणवीसांच्या संकेतानेच हालचाल करतात. ते आमचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांची विविध रूपे आम्ही अनुभवली आहेत.”
लोढा यांच्या या विधानानंतर राज्यात नवी राजकीय चर्चा रंगू लागली आहे. “भाजपचे कार्यकर्ते टिकट मिळो अथवा न मिळो, उत्साहाने कामाला लागतात. त्यामुळंच पक्ष दोन जागांवरून २७५ पर्यंत वाढला.मुंबईतील निवडणूक जिंकण्याची जबाबदारी काही मोजक्या नेत्यांची नाही, ती आपणा सर्वांची आहे. शेजाऱ्याचं मूल कितीही देखणं असलं तरी आपण त्याला मांडीवर घेत नाही; आपल्या लेकरालाच उचलतो.”

