"...आता देश चालवण्यात महिलांचीही भागिदारी असणार", उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
जेव्हा पुरुषासोबत महिलाही आपल्या पायावर उभी राहते, तेव्हा संपूर्ण कुटुंब उभं राहतं. म्हणून मोदींनी महिलांना पायावर उभं करण्याचं काम केलं आहे. २०२६ नंतर या मंचावर अर्ध्या जागा महिलांसाठी राखीव ठेवाव्या लागणार आहेत. कारण मोदींनी महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण दिलं आहे. त्यामुळे आता देश चालवण्यात महिलांची भागिदारी असणार आहे. मला विश्वास आहे की, जगाच्या पाठीवर ज्या देशांनी महिलांना भागिदार करुन घेतलं, तेच देश विकसीत झाले आहेत. म्हणून विकसीत भारतात महिलांना समाविष्ठ करण्याचं काम मोदींच्या माध्यमातून होणार आहे, असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते ईनाम सावर्डे इथे महायुतीच्या सभेत बोलत होते.
फडणवीस जनतेला संबोधीत करताना म्हणाले, आमचे बाराबलुतेदार आहेत, पारंपारिक व्यवसायिक आहेत, यांचा विचार याआधी कोणत्याही प्रधानमंत्र्यांनी केला नव्हता. पण मोदींनी त्यांच्या विचार केला. विश्वकर्मासारखी योजना आणली आणि या योजनेतून बाराबलुतेदारांना १२ हजार कोटी रुपये दिले. त्यांना मोठं मार्केट मिळालं पाहिजे.
त्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे. त्यांच्या पुढच्या पिढीला तो व्यवसाय आधुनिक स्वरुपात मिळाला पाहिजे. तसंच त्यांना वित्तीय पुरवठाही झाला पाहिजे. अशाप्रकारे सामान्य माणसाचा विचार करणारे प्रधानमंत्री मोदी आहेत. अनुसूचित जातीच्या लोकांसाठी स्टँड अप सारखी योजना मोदींनी काढली.
नरेंद्र मोदींनी सांगितलं लोकांचा गॅरंटर मी आहे. यांना विनातारणाचं कर्ज द्या. ६० कोटींहून अधिल कोल आपल्या पायावर उभे राहिले. या ६० कोटी लोकांमध्ये ३१ कोटी महिला आहेत. ज्या मुद्राच्या योजनेत आपल्या पायावर उभ्या राहिल्या. देशात मोदींनी ८० लाख बचत गट तयार केले. त्यासाठी ८ लाख कोटी रुपये दिले.
१० कोटी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आपल्या पायावर उभं केलं. त्यातील एक कोटी महिलांना लखपतीदीदी केलं. येत्या काळात आणखी ३ कोटी महिलांना लखपतीदीदी करणार आहेत. येत्या काळात या सर्व १० कोटी महिला लखपतीदीदी होणार आहेत, अशाप्रकारचं काम मोदींनी केलं आहे.