"सर्जिकल स्ट्राईक करुन पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना धडकी भरवली", फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल
"२६ /११ झाल्यावर भारतानं चोख प्रत्युत्त दिलं नाही. मोदी सत्तेत आल्यावर दहशतवाद नियंत्रणात आला. मोदींचा भारत शत्रूवर थेट हल्ला करतो. यूपीएच्या काळात अनेक दहशतवादी हल्ले झाले. यूपीए सरकार हल्ल्यांचा केवळ निषेध करायचा. पण मोदी सरकराने सर्जिकल स्ट्राईक करुन दहशतवाद्यांना धडकी भरवली, अशी प्रतिक्रिया देत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. फडवणीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसवर सडकून टीका केली.
फडवणीस पुढे म्हणाले, इंडिया आघाडीत सर्वच इंजिन आहेत, डबे नाहीतच. काँग्रेस देशातील संविधान धोक्यात टाकत आहे. भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या विचारधारेला नाकारलं आहे. मी पुन्हा येईन हे एक वाक्य नव्हतं. अडीच वर्षांनंतर मी पुन्हा आलो पण दोन पक्षांना फोडून आलो. पवारांनी मुलीला पक्षाचं अध्यक्ष बनवलं म्हणून पक्ष फुटला. यापुढे राजकीय नेत्यांची मुलं त्यांच्या हिमतीवर राजकारणात येतील, परिवारवादावर बोलताना फडणवीसांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
देशाच्या विकासासाठी आम्हाला तिसऱ्यांदा सत्तेत यायचं आहे. खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष पण निर्णय सोनिया गांधी घेतात. मोदींना तिसऱ्यांदा संधी देण्याचं जनतेनं ठरवलंय. समाज बदलण्यासाठी मोदींना पुन्हा सत्तेत यायचं आहे. मजबूत देशच शांतता प्रस्थापित करु शकतो. मोदी जिंकणार हा अहंकार नव्हे तर आत्मविश्वास आहे. काँग्रेस नसती तर भ्रष्टाचार झाला नसता. मोदींनी देशातील बाहुबली व्यवस्था संपवली. सामान्य माणूस निवडणूक जिंकू शकतो हे सिद्ध झालं. काँग्रेस नसती तर भारताचं विभाजन झालं नसतं, असंही फडणवीस म्हणाले.