PM मोदींवर टीका करणाऱ्या राऊतांवर फडणवीसांची खोचक टीका, म्हणाले, "कोण संजय राऊत..."
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरुच आहेत. खासदार संजय राऊत यांनी बुलढाण्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'औरंगजेब', असं म्हटलं होतं. राऊतांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. "संजय राऊत कोण आहेत. त्यांच्याबद्दल विचारताना माझ्या प्रतिमेचा तरी विचार करा", अशी खोचक टीका फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना केली. यावेळी त्यांनी इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.
फडणवीस म्हणाले, ज्या मतदार संघात भाजपला उमेदवारी मिळेल, तिथे महायुतीनं भाजपला पाठिंबा द्यायचा आहे. जिथे राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला उमेदवार मिळतील, तिथे आम्ही त्यांचं काम करायचं. हर्षवर्धन पाटील जेव्हापासून भाजपमध्ये आले आहेत, त्यांनी सातत्याने भारतीय जनता पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यासारखं नेतृत्व मोठं झालं पाहिजे, ही भारतीय जनता पक्षाची जबाबदारी आहे.
हर्षवर्धन पाटील आमच्या महायुतीच्या उमेदवाराचं काम करतील, याचा मला विश्वास आहे.अमरावतीची जागा भारतीय जनता पक्ष लढेल. नवनीत राणा विद्यमान खासदार आहेत. त्यांनी ५ वर्ष भाजपची आणि मोदींची बाजू मांडली आहे. पण अंतिम निर्णय आमची पार्लमेंट कमिटी घेईल, असंही फडणवीस म्हणाले.