Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला का ढासळला? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, "आदित्यला मंत्री..."

परिवारवादी कितीही पक्ष एकत्र आले, तरीही नरेंद्र मोदींचा पराभव करु शकत नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांना विरोधकांवर सडकून टीका केली. ते नवनीत राणा यांच्या दर्यापूरच्या प्रचारसभेत बोलत होते.
Published by :

मी उद्धव ठाकरेंना असं सांगितलं होतं की, आदित्यला निवडणूक लढू द्या. कारण तुमचा पक्ष नंतर त्याला सांभाळायचा आहे. काहीतरी ट्रेनिंग त्याला मिळायला पाहिजे. पण त्यांना मुख्यमंत्री तर सोडा, मंत्री बनवण्याचाही विचार नव्हता. त्यांनी जर आदित्यला मंत्री बनवलं नसतं, तर त्यांच्या पक्षाची अशी अवस्था झाली नसती. आपल्या कुटुंबाचा विचार करून ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले. काँग्रेसमध्ये सोनिया गांधी राहुल गांधींचाच विचार करतात. शरद पवार फक्त सुप्रिया सुळेंचाच विचार करतात. उद्धव ठाकरेंना आदित्यचाच विचार. तुमचा विचार करणारं कुणीही नाही. पण नरेंद्र मोदी असं व्यक्ती आहेत, चोवीस तास फक्त तुमचाच विचार करतात. चोवीस तास आपल्या रक्ताचा कण आणि कण जनतेसाठी खर्च करणारे नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत. त्यामुळे या परिवारवादी कितीही पक्ष एकत्र आले, तरीही नरेंद्र मोदींचा पराभव करु शकत नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांना विरोधकांवर सडकून टीका केली. ते नवनीत राणा यांच्या दर्यापूरच्या प्रचारसभेत बोलत होते.

फडणवीस म्हणाले, मी शरद पवारांना विचारतो, तुम्ही सरकारचे प्रमुख होता. उद्धव ठाकरे सरकार मध्ये होते. काँग्रेस पक्ष सरकारमध्ये होता. नवनीत राणांचा काय दोष होता. भारतात, महाराष्ट्रात आणि मुंबईत मला रामाचे भक्त यांची हनुमान चालीसा म्हणायची आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या होत्या. पण रवी राणा आणि नवनीत राणा यांना तुरुंगात टाकण्याचं काम उद्धव ठाकरे सरकारने केलं. ते आम्हाला सांगतात, राम मंदिरात सीता नाहीत, म्हणून ते नाराज आहे. हे बेगडी लोक आहे. खोटं बोल पण रेटून बोल, अशी ही लोक आहेत. खरं बोलायला विचार करावा लागत नाही. खोटं बोलायला विचार करावा लागतो.

एकदा खोट बोललं की वारंवार खोटं बोलावं लागतं. नंतर कुठेतरी पोलखोल होते. आज उद्धव ठाकरेंची पोलखोल झाली. ठाकरे भ्रमिष्ट झाले आहेत. आज ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं, आदित्य ठाकरेंना मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीत जाईल. त्यांना वेड लागलं असेल, मला तर नाही ना..अमित शहांनी त्यांना कोणत्यातरी खोलीत नेऊन ठाकरेंना सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्री करतो, हा त्यांचा भ्रम होता.

पण आता त्यांचा भ्रम बदललाय. आता ते म्हणतात, फडणवीसांनी सांगितलं होतं की, आदित्यला मुख्यमंत्री करतो. उद्धवजी आधी हे ठरवा, देवेंद्रंनी सांगितलं की अमित शहांनी...हे भ्रमिष्ट झाले आहेत. ह्यांना खूर्ची गेल्यानंतर काहीच समजत नाहीय. एक खोटं लपवण्यासाठी ते दुसरं खोटं बोलत आहेत. हे सपशेल उघडे पडले आहेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणाले, ही ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपंचायत, विधानसभेची निवडणूक नाही. भारताचा नेता कोण असेल, देशाचं नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचं, याचा निर्णय देणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकीत फक्त दोन पर्याय आपल्यासमोर आहेत. एकीकडे नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करणारे राहुल गांधी आहेत.

देशाचे पंतप्रधान म्हणून मोदी हवे असतील, तर पुन्हा तुम्हाला कमळाचं बटण दाबावं लागेल. मोदींच्या नेतृत्वात मोठी महायुती तयार केलीय. ही आपली विकासाठी गाडी आहे. या गाडीला मोदींचं इंजिन आहे. आमच्या विकासाच्या गाडीला वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे लागले आहेत. आमच्या डब्ब्यात जनसामान्यांना बसण्याची जागा आहे. दिनदलित, गोरगरिब, शेतकरी, मजूर, अल्पसंख्यांक, आदिवासी, महिला, ओबीसी या सर्वांना विकासाच्या गाडीत बसवून सबका साथ सबका विकास करत मोदी पुढे जाणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com