Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

"...म्हणून संपूर्ण भारताचं लक्ष शिर्डीच्या खासदाराकडे आहे"; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

"हा देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील, हा देश कोण विकसित करु शकेल, सर्वसामान्य माणसांच्या आशा-आकांशा आणि अपेक्षा कोण पूर्ण करु शकेल, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे"
Published by :

शिर्डीचा खासदाराला म्हटल्यावर देशभरात त्याला मोठा मान-सन्मान मिळतो. देशभरातले लोक शिर्डीच्या खासदाराकडे एका वेगळ्या नजरेनं पाहत असतात. तुम्ही जो खासदार निवडून देता, तो खासदार तर शिर्डीचा असतो. पण संपूर्ण भारताचं लक्ष या शिर्डीच्या खासदाराकडे सातत्याने लागलेलं असतं. ही निवडणूक साधी नाहीय. ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. हा देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील, हा देश कोण विकसित करु शकेल, सर्वसामान्य माणसांच्या आशा-आकांशा आणि अपेक्षा कोण पूर्ण करु शकेल, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. देशात दोन वेगवेगळे गट निर्माण झालेले पाहायला मिळतात. देशाचं राजकीय चित्र दोन भागांमध्ये विभागलं आहे. एकीकडे नरेंद्र मोदी आहेत. दुसरीकडे राहुल गांधी आहेत. मोदींच्या समवेत महायुतीतील सर्व घटक पक्ष आहेत. मोदींच्या नेतृत्वात ही महायुती काम करत आहे, असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते शिर्डीत सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

विरोधकांवर टीका करताना फडणवीस म्हणाले, राहुल गांधींच्या नेतृत्वात २४ पक्ष एकत्र आले आहेत. पण या २४ पक्षांमध्ये कुणी कुणाला नेताच मानायला तयार नाहीय. प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार कोण आहे, हे त्यांना विचारल्यावर ते सांगू शकत नाहीत. त्यांचे नेते सांगतात, आम्ही निवडून आलो, तर आम्ही पाच वर्षात पाच प्रधानमंत्री करू. मी त्यांना म्हटलं, तुम्ही पाच पंतप्रधान कराल, पण पहिला पंतप्रधान कसा निवडाल? असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला.

मग माझ्या लक्षात आलं, आपण लहानपणी संगीत खुर्चीचा खेळ खेळायचो. त्या खूर्चीच्या बाजूला सर्व जण गोलगोल फिरायचे. संगीत बंद झाल्यावर जो खूर्चीवर बसला तो जिंकला. तसं हे लोक एक खूर्ची ठेवणार आणि यांच्या आजूबाजूला २४ लोक फिरणार. जो खूर्चीवर पहिला बसला, तो पहिला पंतप्रधान, दुसऱ्या खूर्चीवर बसला तो दुसरा पंतप्रधान, अशाप्रकारे पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा यांचा मानस आहे.

हा देश आहे. ही काय खासगी कंपनी आहे का? हे काय कुणाच्या मालकीचं खासगी उद्योग आहे का, या देशात त्यांच्याजवळ नेताही नाही आणि नितीही नाही. मोदी महायुतीचं मजबूत इंजिन आहेत. वेगवेगळे पक्ष या महायुतीचे डब्बे आहेत. या डब्ब्यांमध्ये दिनदलित, गोरगरिब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्यांक, ओबीसी, भटके, विमुक्त या सर्वांना बसण्यासाठी जागा आहे. सर्वांना विकासाच्या गाडीत बसवून मोदी सबका साथ, सबका विकास म्हणत वेगानं पुढं जात आहेत. दुसरीकडे डब्बेच नाही आहेत. सर्व इंजिन आहेत. राहुल गांधी म्हणतात, मी इंजिन आहे. पवार साहेब म्हणतात, मी इंजिन आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, मी इंजिन आहे. स्टॅलिन म्हणतो, मी इंजिन आहे.

मुलायमचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे. ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे. तिथे डब्बे नाहीच आहेत. इंजिनमध्ये बसण्याकरता सामान्य माणसाला जागा नसते. त्यात फक्त ड्रायव्हर बसतो. राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनाच जागा आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे. शरद पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळेंसाठी जागा आहे. तुमच्यासाठी त्यांच्याकडे जागा नाहीय. तुम्ही लोखंडेंना निवडून दिल्यावर शिर्डी मतदारसंघाची बोगी मोदींच्या इंजिनला लागेल. त्यानंतर या मतदारसंघाला कुणी थांबवू शकणार नाही, असंही फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com