Flight Service From India to China : भारतातून चीनला जाण्यासाठी आता मिळणार थेट विमान सेवा
थोडक्यात
भारतातून चीनला जाण्यासाठी आता मिळणार थेट विमान सेवा
2020 पासून बंद असलेल्या भारत आणि चीनमधील थेट हवाई सेवा आता पुन्हा सुरू
भारताच्या बाजूने एअर इंडिया आणि इंडिगो या सेवा पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत
(Flight Service From India to China ) 2020 पासून बंद असलेल्या भारत आणि चीनमधील थेट हवाई सेवा आता पुन्हा सुरू होणार आहे. भारतीय विमानन नियामक डीजीसीएकडे प्रलंबित असलेल्या चीनच्या तीन विमान कंपन्यांच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे आणि अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत परवानगी दिली जाईल. त्यानंतर आवश्यक औपचारिकता पूर्ण होताच या हिवाळ्यात डायरेक्ट फ्लाइट्स सुरू होऊ शकतात.
माहितीनुसार, दिल्ली आणि मुंबई येथून चीनमधील प्रमुख शहरे बीजिंग, शांघाय, ग्वांगझू आणि चेंग्दू यांच्यासाठी थेट उड्डाणे सुरू केली जाणार आहेत. कोविड-19 महामारी आणि गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर वाढलेल्या तणावामुळे 2020 पासून या दोन देशांदरम्यान थेट सेवा बंद करण्यात आल्या होत्या. सध्या प्रवाशांना सिंगापूर, हाँगकाँग किंवा बँकॉकसारख्या तृतीय देशांमार्गे चीनमध्ये जावे लागते, ज्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही जास्त खर्च होतो.
भारताच्या बाजूने एअर इंडिया आणि इंडिगो या सेवा पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. तर चीनकडून एअर चायना, चायना ईस्टर्न, चायना सदर्न आणि शेंडॉंग एअरलाइन्स यांनी डीजीसीए आणि दिल्ली विमानतळावर स्लॉटसाठी अर्ज केला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर या एअरलाइन्स भारतात आपली उड्डाणे सुरू करू शकतील.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की डायरेक्ट फ्लाइट्स सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि त्याचबरोबर व्यापार व पर्यटनालाही चालना मिळेल.