Jayakwadi Dam : मराठवाड्यावर पाणीसंकट? जायकवाडी धरणाचं प्रचंड प्रमाणात बाष्पीभवन; 12 तासात सुमारे 6 दिवसांच्या पाण्याची वाफ
मराठवाड्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या जायकवाडी धरणातून शुक्रवारी (2 मे) तब्बल 2.035 दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले. ही आकडेवारी केवळ चिंताजनक आहे. जायकवाडी हे राज्यातील सर्वात मोठे धरण आहे.
सध्या जायकवाडीमध्ये सर्वाधिक 39 टक्के उपयुक्त साठा आहे. मात्र उन्हाच्या तीव्र झळांमुळे या साठ्यावर बाष्पीभवनाचा गंभीर फटका बसतोय. मे महिन्याच्या सुरुवातीलाच कमाल तापमान 40 अंशांच्या पुढे गेल्याने बाष्पीभवनात झपाट्याने वाढ झाली आहे, आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत ही स्थिती अधिकच गंभीर होणार आहे.
सध्या संपूर्ण मराठवाड्यातील 11 मोठ्या जलप्रकल्पांमध्ये केवळ 22 टक्के म्हणजे 1453 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये जायकवाडीचा वाटा मोठा असला, तरी वाढते बाष्पीभवन हा साठा झपाट्याने कमी करत आहे. पाणी नियोजनाच्या दृष्टीने हे संकेत गंभीर असून, प्रशासन आणि नागरिकांनी जलसाक्षरतेकडे वळण्याची ही अत्यंत गरजेची वेळ आहे. अन्यथा यंदाच्या उन्हाळ्यात मराठवाड्याला तीव्र जलटंचाईचा सामना करावा लागेल.