Mohan Bhagwat : दसरा मेळावा अन् संघाची शताब्दी, मोहन भागवतांनी केलं गांधींचं स्मरण
थोडक्यात
विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर दसरा मेळावा अन् संघाची शताब्दी,
मोहन भागवतांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत आत्मनिर्भर होण्याचं आवाहन केलं
आरएसएसची स्थापना १९२५ मध्ये विजयादशमीच्या दिवशी झाली होती
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर दसरा मेळावा साजरा होतोय. (Dussehra) संघाला त्याचबरोबर १०० वर्षही पूर्ण होत आहेत. आरएसएसची स्थापना १९२५ मध्ये विजयादशमीच्या दिवशी झाली होती. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी नागपुरातील रेशमबाग मैदानात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत आत्मनिर्भर होण्याचं आवाहन केलं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात आयोजित विजयादशमी उत्सव कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही त्यांना नमन केलं. संघ प्रमुख मोहन भागवत आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विजयादशमी २०२५ च्या निमित्ताने शस्त्र पूजन केले. या विजयादशमी उत्सवात घाना, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, थायलंड, यूके, यूएसए यांसारख्या विविध देशांतील अनेक विदेशी पाहुणे देखील सहभागी झाले आहेत.
सरसंघचालक मोहन भागवतांनी महत्त्वपूर्ण विषयांवर भाष्य केलं. यंदाचे वर्ष श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या बलिदान वर्षाचे आहे. अन्याय आणि अत्याचारातून समाजाला मुक्ती देण्यासाठी हिंद की चादर बनून बलिदान देणाऱ्या या महान व्यक्तीचे या वर्षात स्मरण केले जाईल, असे मोहन भागवत म्हणाले. त्यासोबतच यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या योगदानावरही भाष्य केले. आज गांधी जयंती देखील आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वातंत्र्यानंतर देशाची व्यवस्था कशी असावी याबद्दल विचार देणाऱ्यांमध्ये गांधीजींचे योगदान अविस्मरणीय आहे, असंही ते म्हणाले.