पाण्याच्या बॉटलसाठी 5 रुपये मिळवलं मात्र 50 हजार गमवले
मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर खाद्यपदार्थ स्टॉलधारकाला रेलनीरच्या पाण्याची बाटली विकताना प्रवाशांकडून जादा पैसे घेणे एका स्टॉलधारकाला महागात पडलं आहे. रेलनीर पाण्याच्या बाटली १५ रुपयांऐवजी २० रुपये ग्राहकांकडून आकारत असल्याने मध्य रेल्वेने स्टॉलधारकावर कारवाई करत ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस येथील स्टॉलमालकाने रेलनीरच्या पाण्याची बॉटल १५ रुपयांऐवजी २० रुपयांना विकली. या प्रकरणी स्टॉलमालकाला ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. अशी माहिती शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे यांनी दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे स्थानकांमध्ये बाटली बंद रेलनीर पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना इतर कंपन्याचे बाटली बंद पाणी जादा पैसे मोजून घ्यावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. यांच्या फायदा घेत काही रेल्वे स्थानकांवरील स्टॉलधारकाकडून रेलनीरच्या पाण्याची बॉटल १५ रुपयांऐवजी २० रुपये किमतीमध्ये विक्री करून प्रवाशांची लूट केली जात आहे.