Samrudhhi Highway : समृद्धी महामार्गावर अपघात, एका चुकीमुळे चालकाने जीव गमावला
समृद्धी महामार्गावर गुरुवारी (११ एप्रिल) सकाळी झालेल्या भीषण अपघातात आयशर वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला. जालना जिल्ह्यातील जामवाडी शिवारात सकाळी सुमारास ही घटना घडली. गुलाब काळू आडे (वय ५०, रा. हलविरा तांडा, ता. जिंतूर, जि. परभणी) असे मृत चालकाचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गुलाब आडे हे आयशर वाहन घेऊन समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होते. मात्र सकाळी ४ वाजेच्या सुमारास त्यांना डुलकी आल्याने वाहनाने थेट दुभाजकाला धडक दिली. या धडकेत वाहनाची केबिन पूर्णतः चुरगाळली गेली आणि चालक केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाले. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील आरपीव्ही टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृत चालकाला केबिनमधून कटरच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे मृतदेह हलवण्यात आला. या अपघातानंतर पाठीमागून येणारे दुसरे एक आयशर वाहनही या वाहनाला धडकले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक रामदास निकम यांनी भेट देऊन वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी उपाययोजना केल्या. अपघातग्रस्त वाहने हायड्राच्या मदतीने बाजूला करण्यात आली व दोन लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या. यामध्ये अशोक काळे, गवई, राठोड, खरात, लहू जाधव, आनंद भोरे, सुनील वाघ व इलियास यांचा मोलाचा सहभाग होता. या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.