Rohit Pawar : मातृभाषेवर प्रेम करतानाच इंग्रजीकडं दुर्लक्ष करुन चालणार नाही
शालेय अभ्यासक्रमातील इंग्रजीचं बंधन शिथील होणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या पहिली ते 12वीपर्यंत इंग्रजीचे शिक्षण अविनार्य आहे. मात्र यापुढे 11वी आणि 12वीमध्ये इंग्रजीची सक्ती नसेल. असे राज्याच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्यातून समोर आल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने बनवलेल्या राज्याच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्यात मातृभाषेसह भारतीय भाषांना विशेष महत्त्व देण्यात आले ही चांगली गोष्ट असली तरी इंग्रजीबाबत मात्र संदिग्धता आहे.
यासोबतच ते म्हणाले की, इंग्रजी ही रोजगाराची आणि जगाची भाषा बनली असल्यामुळंच काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात पहिलीपासून इंग्रजी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र आज इंग्रजीकडं दुर्लक्ष केल्यास पुढील पिढ्यांना जागतिक रोजगाराच्या संधीपासून लांब रहावं लागेल. याबाबत सरकारने तातडीने खुलासा करणं गरजेचं आहे. मातृभाषेवर प्रेम करतानाच इंग्रजीकडं दुर्लक्ष करुन चालणार नाही. असं रोहित पवार म्हणाले.