Devendra Fadnavis : समृद्धी महामार्गावरून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टॉक शो विथ देवा भाऊ या शोच आयोजन केले होते.. बऱ्याच महत्त्वाच्या विषयांवर आणि प्रश्नांवर प्रश्न उत्तरे झाली. देवेंद्र फडणीस यांनी बरीच काही नवीन माहिती आणि खुलासे केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास, राजकीय भूमिका आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत राज्याच्या राजकारणाला वेग दिला आहे. समृद्धी महामार्गाच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, दुसरीकडे MIMसोबत कोणत्याही परिस्थितीत युती करणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी स्पष्ट केली. याचवेळी मुंबईत होणाऱ्या प्रचार सभांमुळे आणि अहिल्यानगरमधील महापौरपदाबाबतच्या दाव्यामुळे महायुती आक्रमक मोडमध्ये असल्याचं चित्र दिसत आहे.
समृद्धी महामार्गासाठी उद्धव ठाकरेंनी जागाच दिली नाही – फडणवीस
समृद्धी महामार्गाच्या संकल्पनेपासून अंमलबजावणीपर्यंतचा प्रवास सांगताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला. “समृद्धी महामार्गासाठी उद्धव ठाकरेंनी टीचभरही जागा दिली नाही,” असा आरोप करत त्यांनी तत्कालीन सरकारवर विकासकामांना अडथळे आणल्याचा ठपका ठेवला. समृद्धी महामार्गामुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राचा कायापालट झाला असून, छत्रपती संभाजीनगर हे आता पुण्यानंतरचं पुढचं मोठं औद्योगिक केंद्र बनल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.

