पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा परिसरात भीषण अपघात घडला आहे. इंद्रायणी नदीवरील एक जुना लोखंडी पूल रविवारी दुपारी अचानक कोसळला. या दुर्घटनेत सुमारे 20 ते 25 पर्यटक नदीत वाहून गेले असून, आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे नदीतील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. रविवार असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी सहलीसाठी आले होते.
हा पूल अत्यंत जीर्ण अवस्थेत होता आणि त्यावरून पायी चालण्यासह दुचाकी वाहने देखील नेली जात होती. यामुळे पुलावर अनपेक्षित भार आला आणि तो क्षणार्धात कोसळला. पुलाचे दोन तुकडे झाले आणि त्यावरून चालणारे पर्यटक थेट नदीत कोसळले. घटनास्थळी एनडीआरएफचे जवान, पोलिस, आणि आपत्कालीन सेवा तातडीने दाखल झाले असून, बचावकार्य सुरू आहे. 38 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. दरम्यान हा पूल नेमका कसा कोसळला आणि हा पूल कोसळण्यामागे काय कारण आहे हे जाणून घ्या...
पूल अनेक वर्षांपासून देखभालविना होता. त्यामुळे त्याची अवस्था खूपच खराब झाली होती.
पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूकही सुरू होती. अपघाताच्या वेळी देखील काही दुचाकी वाहनं पुलावर होती.
रविवार असल्यामुळे पर्यटनस्थळी खूप गर्दी झाली होती. पुलावरही अनेक लोक एकाच वेळी चालत होते, ज्यामुळे वजनाचा ताण वाढला.