Food In Shravan : श्रावण महिन्यात 'हे' पदार्थ खाणं टाळा; आरोग्य राहील उत्तम

Food In Shravan : श्रावण महिन्यात 'हे' पदार्थ खाणं टाळा; आरोग्य राहील उत्तम

भगवान शंकराला समर्पित श्रावण महिना लवकरच सुरू होत असून, या पवित्र काळात उपवास, व्रतवैकल्यासोबतच खाण्यापिण्यावर बंधनं घालणं ही एक पारंपरिक रीत बनली आहे.
Published by :
Team Lokshahi

भगवान शंकराला समर्पित श्रावण महिना लवकरच सुरू होत असून, या पवित्र काळात उपवास, व्रतवैकल्यासोबतच खाण्यापिण्यावर बंधनं घालणं ही एक पारंपरिक रीत बनली आहे. या काळात विशेषतः दूध, दही, वांगी, ताक, रायता यांसारख्या पदार्थांचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो. ही परंपरा केवळ श्रद्धेपुरती मर्यादित नसून, त्यामागे शास्त्रीय कारणंही तितकीच महत्त्वाचं असल्याचं सांगितलं जातं.

1. पालेभाज्या आणि वांगी टाळावीत

श्रावण महिन्यात वातावरणात आर्द्रता वाढलेली असते. अशा हवामानात पालेभाज्यांमध्ये आणि वांग्यांमध्ये कीटक, बुरशी आणि सूक्ष्मजंतू सहजपणे वाढतात. दिसायला ताज्या भासणाऱ्या भाज्याही प्रत्यक्षात संक्रमित असण्याची शक्यता अधिक असते. त्याशिवाय वांगी ही पचायला जड भाजी असल्याने पावसाळ्यात अपचन, गॅससारख्या समस्यांना निमंत्रण देऊ शकते. त्यामुळे धार्मिक परंपरेसोबतच ही एक प्रकारची आरोग्यदृष्टीने काळजी मानली जाते.

2. दूध-दह्याबाबत विशेष दक्षता आवश्यक

न्युट्रिशनिस्ट नीती शर्मा यांच्यानुसार, पावसाळ्यात जनावरे ज्या गवतावर चरतात, त्यामध्ये बुरशीजन्य घटक असतात. याचा थेट परिणाम दुधाच्या गुणवत्तेवर होतो. अशा दुधाचे सेवन केल्याने ते पचनास जड जाते आणि शरीराला त्रासदायक ठरू शकते. याचप्रमाणे दही, ताक, रायता हे पदार्थही या काळात टाळावे.

3. थंड पदार्थ आणि मंदावलेली पचनशक्ती

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील पाचनक्षमता कमी झालेली असते. रायता, ताक, कढी यासारखे थंड व स्निग्ध पदार्थ या काळात शरीरात थंडी वाढवतात, ज्यामुळे अपचन, अॅसिडिटी, गॅस यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय वातावरणात भरपूर प्रमाणात बाह्य जंतू व बुरशीजन्य घटक असतात, जे अशा पदार्थांमध्ये सहजपणे संक्रमित होऊ शकतात.

4. श्रावणात धार्मिकतेसोबत आरोग्याचाही विचार

श्रावण हा फक्त भक्तिभावाचा महिना नसून, तो शरीरशुद्धी व मानसिक आरोग्याचा काळ मानला जातो. त्यामुळे पारंपरिक नियम हे अंधश्रद्धा नव्हे, तर पूर्वजांचा आरोग्यविषयक अनुभव असल्याचं स्पष्ट होतं. पथ्याचे हे नियम आधुनिक विज्ञानाच्या कसोटीतही तितकेच प्रभावी ठरतात.

5. पथ्यं म्हणजे पूर्वीपासूनची आरोग्य संपन्न पद्धत

"आपल्या आजी-आजोबांनी सांगितलेली पथ्यं ही केवळ परंपरेची आठवण नाही, तर त्या काळातील आरोग्यशास्त्र होती," असं नीती शर्मा स्पष्ट करतात. पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, त्यामुळे हलका, शिजवलेला, ताजा व पचायला सोपा आहार घेणं हेच उत्तम आरोग्याचं रहस्य मानावं लागतं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com