Naxalism : नक्षलवाद संपवण्याच्या मोहिमेत सरकारला मोठं यश, 75 तासांत 303 नक्षलींचे आत्मसमर्पण
थोडक्यात
नक्षलवाद संपवण्याच्या मोहिमेत सरकारला मोठं यश
75 तासांत 303 नक्षलींचे आत्मसमर्पण
सरकारने एक रिपोर्टच सादर केला
येत्या 31 मार्च 2026 पर्यंत केंद्र सरकारने देशातील नक्षलवाद समूळ नष्ट करण्याचा प्रण केलेला आहे. त्यासाठी गृहमंत्रालयाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. काही ठिकाणी नक्षलवाद्यांच्या तळांवर हल्ले केले जात आहेत. तर काही नक्षलींचे प्रबोधन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणले जात आहे. याच मोहिमेसंदर्भात केंद्रसरकारने मोठा दावा केला आहे. फक्त 11 जिल्ह्यांपुरता मर्यादित आता नक्षलवाद राहिला आहे, असे सरकारने सांगितले आहे. तसेच लवकरच आम्ही नक्षलवादाला संपवू असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारने समोर आणला नवा रिपोर्ट
देशात 1967 सालापासून नक्षलवादी चळवळ पाहायला मिळते. आता याच नक्षलवादाचा प्रभाव कमी झाला आहे, असे केंद्र सरकारकडून सांगितले जात आहे. नुकतेच केंद्र सरकारने एक रिपोर्ट सार्वजनिक केला आहे. या रिपोर्टमध्ये सरकारने अनेक दावे केले आहेत. याच दाव्यांवर भाष्य करणारा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये अगोदर नक्षलवादाचा प्रभाव असणारे जिल्हे आणि आता नक्षलवादाचा प्रभाव असलेले जिल्हे दाखवण्यात आले आहेत.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 75 तासांत देशात 303 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. 2014 सालाच्या अगोदर 182 जिल्ह्यांमध्ये नक्षलवादाचा प्रभाव होता. आता ही संख्या फक्त 11 जिल्ह्यांपर्यंत राहिली आहे. 2014 साली 330 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गृहमंत्रालयाच्या दाव्यानुसार नक्षली हिंसेच्या घटना घडल्या होत्या. आता ही संख्या फारच कमी झाली आहे. नक्षलवादाचा अगोदर 18 हजार वर्ग किलोमीटरपर्यंत प्रभाव होता. आता तो फक्त 4200 वर्ग किलोमीटरपर्यंत शिल्लक राहिलेला आहे.