शिंदे-फडणवीस सरकारकडून मृत पत्रकार शशिकांत वारिसेंच्या कुटुंबीयांना 25 लाखांच्या मदतीची घोषणा
निसार शेख|रत्नागिरी: पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण पेटलं आहे. त्यातच विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत शिंदे फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. अशातच आता शिंदे-फडणवीस सरकारच्या वतीने मृत पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबियांना 25 लाखांची आर्थिक मदत केली जाणार जाहिर केले आहे. याबाबत राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली.
काय म्हणाले उदय सांमत?
रत्नागिरी मध्ये रोजगार मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, शशिकांत वारीसे यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येनंतर आरोपीला अटक केली. त्यानंतर महाराष्ट्रातील पत्रकारांनी, रत्नागिरीतील स्थानिक पत्रकारांनी आणि सर्वसामान्य जनतेने मृत पत्रकाराच्या कुटुंबियांना महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. या पत्रकारांच्या मागणीनंतर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी मृत पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यास सांगितले. असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर मृत पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत कशा पद्धतीने केली जाणार? तसेच ही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून केली जाणार? किंवा अन्य कोणत्या ठिकाणाहून केली जाणार? याबाबत सरकार जबाबदार असेल, असेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. मृत पत्रकार शशिकांच वारीसे यांच्या मुलगा सध्या आयटीआयचे शिक्षण घेत आहेत. भविष्यात त्यांच्या मुलाला नोकरीची गरज आणि पुढे शिक्षण करावेसे वाटले तर त्याचा सगळा खर्च मी पालकमंत्री म्हणून करीन. असेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.