'राज्यपाल असो वा राष्ट्रपती,राजेंबाबत कोणी बोलू नये' गुलाबराव पाटलांचा राज्यपालांना घरचा आहेर
राज्यपाल असो वा राष्ट्रपती, राजे राजे आहेत. त्यामुळे राजांवर कोणी बोलू नये असे मत शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. छत्रपती हा देवांचा देव त्यामुळे छत्रपतींच्या बाबतीत प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे असा टोला नाव न घेता गुलाबराव पाटील यांनी राज्यपालांना लगावला आहे.
सीमा प्रश्नावरून राज्यात वातावरण तापले आहे. अशातच गुलाबराव पाटलांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यानाही सुनावले आहे. पहिले राष्ट्र मग राज्य हे आपले पहिलं उद्दिष्ट असून राज्य टिकवण्यासाठी बाळासाहेबांनी प्रबोधनकारांनी व मराठी माणसांनी आपली आहुती दिली आहे. त्यामुळे राज्यासाठी सर्वांनी पक्ष बाजूला सारले पाहिजे असे मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.
काय म्हणाले होते राज्यपाल?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.
आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असे विधान राज्यपालांनी केले आहे.