राज्यपाल पद जाताच माझी CBI चौकशी सुरु होईल; सत्यपाल मलिकांनी केला दावा
शेतकरी आंदोलनासह अनेक मुद्द्यांवर वक्तव्य करून मोदी सरकारला अस्वस्थ करणारे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक ३० सप्टेंबर रोजी पदावरून निवृत्त होत आहेत. भविष्यात निवडणुकीच्या मैदानात उतरणार नसले तरी चळवळीशी मात्र ते जोडलेले राहणार असल्याचं ते सांगतात. याशिवाय भविष्यात पुस्तक लिहिण्याचीही त्यांची इच्छा आहे. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून काम करत असताना लाच घेतल्याच्या आरोपाचा सामानाही त्यांना करावा लागला होता. सत्यपाल मलिक म्हणाले, की पद सोडताच आपल्याला सीबीआय या प्रकरणाच्या चौकशीचाही सामना करावा लागू शकतो.
मेघालयचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गतवर्षी १७ मार्च रोजी केलेल्या वक्तव्याने मोठा वाद उभा राहिला आहे. त्यावेळी मलिक यांनी कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. ते म्हणाले होते की, कुत्री मेली तरी नेते शोक करतात, मात्र इथे 250 शेतकरी मेले आणि कोणी काही बोललं नाही. केंद्रातील मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात चार राज्यांमध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे.
"अचानक झालेल्या बदल्यांवर मी निवृत्तीनंतर बोलेन"
३० सप्टेंबर रोजी राज्यपाल पदावरून निवृत्त होत असले तरी सक्रिय राजकारणात येण्याऐवजी आपण चळवळीत उतरू इच्छितो, असं ते म्हणाले. पुस्तक लिहिण्याबाबतही ते बोलले आहेत. मोदींच्या कारकिर्दीत चार राज्यांतील बदल्यांवर मलिक म्हणाले की, मला यावर आत्ताच काही बोलायचं नाही, मात्र निवृत्तीनंतर आपण यावर बोलणारे आहे.