"भाजपने जनतेचे पैसे GST च्या माध्यमातून अदानींच्या घरी पाठवले", जाहीरनामा सादर होताच नाना पटोलेंचा घणाघात
Nana Patole Press Conference : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केलीय. भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध करून पुन्हा जुमला लोकांच्या समोर मांडून मत कशी पुन्हा मिळवता येतील, अशाप्रकारचा अयशस्वी प्रयत्न नरेंद्र मोदींनी केला आहे. त्यांना गरिब, शेतकरी, व्यापारी, तरुण लक्षात आले, अशा पद्धतीचा तो जाहीरनामा आहे. गेल्या दहा वर्षात ज्या अदानीला तुम्ही पूर्ण देशाची संपत्ती लुटून दिली. सर्वसामान्य जनतेचे पैसे जीएसटीच्या माध्यमातून अदानीच्या घरी पाठवले, ते पण तुमच्या जाहीरनाम्यात यायला पाहिजे होतं. एकीकडे शेतकरी, गरिब, बेरोजगार दाखवायचा आणि सत्तेचा वाटा गेल्या दहा वर्षात अदानीला लुटून दिला आहे. हा जुमला आता चालणार नाही. हा खोटा जाहीरनामा भाजपने जनतेसमोर मांडला आहे.
पटोले पत्रकार परिषदेत म्हणाले, आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. भाजपने खोटा जाहीरनामा सादर केला आहे. पण जनतेनं त्याला मान्यता दिली नाही. त्याचा कोणताही परिणाम या निवडणुकीत होणार नाही. सलमान खानच्या घराजवळ गोळीबार झाला, यावर बोलताना पटोले म्हणाले, महाराष्ट्रात कायदा सुव्यस्था बिघडली आहे. राज्यात अनेक घटना घडत आहेत. इंदापूरमध्ये घटना घडली. सलमानच्या घराजवळ गोळीबार झाला, जे सत्तेत लोक बसले आहेत, ते याला कारणीभूत आहेत. सर्वात भयानक गोष्ट आहे की, चंद्रपूरला भाजपच्या उमेदवाराच्या प्रचाराला सुसंस्कृत आणि देशाचं पंतप्रधान बनण्याचं स्वप्न ते दाखवतात.
२०१४ मध्ये गडकरीचं स्वप्न होतं. काँग्रेसच्या महिला उमेदवारासमोर भाजपचे उमेदवार मुनगंटीवार आहेत. त्यांना म्हणतात, शिलाजीत खाल्लेला पैलवान. शिलाजीत कशासाठी खातात? अशी संस्कृती भाजपमध्ये असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे. असंस्कृत मानसिकतेच्या लोकांना आता सत्तेतच येऊ दिलं नाही पाहिजे. अशा लोकांच्या भूमिकेमुळं राज्यात कायदा सुव्यवस्था कशी राखणार? ही परिस्थिती भयावह आहे. शिलाजीत खाल्लेला उमेदवार आमच्याजवळ आहे, असं महिला उमेदवारांना दाखवणं, ही असंस्कृत पणाची गडकरींची भूमिका आहे, असं म्हणत पटोलेंनी भाजपवर तोफ डागली.