India vs Pakistan War : राज्याच्या सुरक्षेवर CM-DCM चं बारीक लक्ष; उच्चस्तरिय बैठकीत दिल्या 'या' सूचना

India vs Pakistan War : राज्याच्या सुरक्षेवर CM-DCM चं बारीक लक्ष; उच्चस्तरिय बैठकीत दिल्या 'या' सूचना

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यात अलर्ट जारी केला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यात अलर्ट जारी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थान, मुंबई येथे आज, शुक्रवारी एक महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रभारी मुख्य सचिव, राज्य पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई महापालिका आयुक्त, नागरी सुरक्षेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक, प्रधान सचिव यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा आणि आपत्कालीन तयारीचा सखोल आढावा घेतला. संभाव्य आपत्ती किंवा युद्धजन्य स्थितीत नागरिकांचे प्राण आणि मालमत्ता सुरक्षित राहावे, यावर भर देत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय आणि निर्देश दिले.

मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्देश

प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल घेणे आणि ‘वॉर रूम’ स्थापन करणे.

ब्लॅकआऊटस्थितीत रुग्णालयांची सेवा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक उपाय, तसेच काचा, पडद्यांद्वारे बाह्य प्रकाश पूर्ण रोखण्याच्या सूचना.

जनजागृतीसाठी व्हिडीओ आणि माहितीजन्य मोहीम राबवणे.

युनियन वॉर बुकचा अभ्यास आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे.

सायबर सेलमार्फत सोशल मीडियावर सतत नजर ठेवणे; देशविरोधी पोस्टवर कठोर कारवाई.

प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन निधी तत्काळ उपलब्ध करून देणे.

MMR मधील महापालिका आणि सोसायट्यांचा समावेश करून ब्लॅकआऊटबाबत जागरूकता निर्माण करणे.

पोलीस गस्त वाढवून कोम्बिंग ऑपरेशन तीव्र करणे.

सैनिकी हालचालींचे चित्रीकरण रोखणे आणि अशा प्रकारांवर गुन्हे दाखल करणे.

सागरी सुरक्षेसाठी फिशिंग ट्रॉलर्सचा उपयोग करणे.

शासनाकडून अधिकृत, अचूक आणि वेळेवर माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे.

महत्त्वाच्या सेवांचे सायबर ऑडिट करून संरक्षण वाढवणे.

लष्करी आणि कोस्टगार्ड यांच्यासोबत समन्वय राखण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक.

आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करणे.

राज्य शासनाने जनतेला घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com