BMC Election : मुंबई महापालिकेत भाजपाला किती जागा मिळतील? मोहित कंबोज यांचा मोठा दावा

BMC Election : मुंबई महापालिकेत भाजपाला किती जागा मिळतील? मोहित कंबोज यांचा मोठा दावा

मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, अवघ्या काही तासांत मुंबईच्या राजकारणाचं चित्र स्पष्ट होणार आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, अवघ्या काही तासांत मुंबईच्या राजकारणाचं चित्र स्पष्ट होणार आहे. तब्बल १५ हजारांहून अधिक उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतपेट्यांमध्ये बंद झालेलं उघडणार आहे. २२७ जागांच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेवर कोणाची सत्ता येणार, याकडे केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी एक मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट शेअर करत “भाजपाला मुंबई महापालिकेत १०० पेक्षा अधिक जागा मिळतील” असा थेट अंदाज व्यक्त केला आहे. कंबोज यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

ठाकरे बंधूंना किती यश?

या निवडणुकीत ठाकरे बंधू – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे – दीर्घकाळानंतर एकत्र आले होते. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांची युती मुंबईत किती प्रभावी ठरते, याचीही आज कसोटी लागणार आहे. शिवसेनेचा २५ वर्षांचा बालेकिल्ला भाजप भेदणार का, हा प्रश्न सध्या सर्वात महत्त्वाचा ठरतो आहे.

शिंदे गटाची भूमिका निर्णायक?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनंही महायुतीच्या माध्यमातून जोरदार लढत दिली आहे. त्यामुळे भाजप-शिंदे गट मिळून बहुमताच्या जवळ पोहोचणार का, की पुन्हा एकदा त्रिशंकू परिस्थिती निर्माण होणार, याकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष आहे.

मतमोजणीवर कडेकोट बंदोबस्त

मुंबईतील विविध मतमोजणी केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी १० वाजल्यापासून टप्प्याटप्प्याने प्रभागनिहाय मतमोजणी सुरू असून, प्रत्येक तासाला निकालांचं चित्र अधिक स्पष्ट होत जाणार आहे. कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत.

राजकीय समीकरणे बदलणार?

मोहित कंबोज यांच्या दाव्याप्रमाणे भाजपाला १००+ जागा मिळाल्यास, मुंबईच्या सत्ताकेंद्रात मोठा बदल होणार आहे. पहिल्यांदाच भाजपाचा महापौर बसण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र अंतिम निर्णय मतदारांनी दिलेल्या कौलावरच अवलंबून आहे.आता काही तासांतच हे स्पष्ट होईल की, मुंबईची सत्ता कोणाच्या हाती जाणार आणि मुंबईकरांनी कोणावर विश्वास टाकला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com