Manoj Jarange : मुंबईवर मराठा आंदोलनाची धडक! जरांगेंचा सरकारला इशारा 'मराठ्यांची औलाद काय आहे ...'
मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिकच तीव्र होत चालला असून या लढ्यातील प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. बीडमध्ये झालेल्या सभेत त्यांनी सरकारला, पोलिसांना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारे दिले. "मराठ्यांच्या पोरांना डिवचलं, तर मी सोडणार नाही. माझ्या जातीला जर कोणी छेडलं, तर त्याची किंमत मोजावी लागेल," असे ठणकावून सांगत त्यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईवर धडकण्याचा निर्धार पुन्हा एकदा व्यक्त केला.
"29 ऑगस्टला मुंबईवर धडकणार"
मनोज जरांगे यांनी सभेत उपस्थित मराठा बांधवांना आवाहन करताना सांगितले, "आता 29 ऑगस्टला आपली फाईट आहे. लाखो मराठा बांधवांनी शांततेत मुंबईत दाखल व्हावं. मला मुंबईत मारतील, असेही सांगितले जात होते. पण जर माझ्या समाजाला कोणी डिवचलं, तर आम्ही मराठ्यांची औलाद काय असते ते दाखवून देऊ. आपल्याला हिंसा नको, पण लढाई मात्र ठाम आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका
सभेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. "फडणवीस डीवायएसपींना चिल्लर चाळे करायला लावत आहेत. आमची जात शांततेत मागणी करत आहे, तरीही आम्हाला छेडलं जातं. डीजेवर बंदी घालून आम्हाला डिवचलं जातं. हा डीजे एवढा मोठा गुन्हा आहे का? बीडमध्ये दंगल घडवण्याचा सरकारचा डाव होता का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पोलिसांना कठोर इशारा
डीजे वाजवू दिला नाही, यावरून जरांगे संतप्त झाले. त्यांनी पोलिसांना थेट इशारा देत सांगितले, "सत्ता येत-जात असते. पण मी फार खुनशी आहे. एखादा माझ्या डोक्यात बसला की त्याचा बाजार उठवून टाकतो. बीड जिल्ह्यात दुसऱ्या कोणाचा डीजे वाजू दिलात तर मग सांगतो," असे ते म्हणाले.
"माझ्या लेकराबाळांचा प्रश्न आहे"
सभेत बोलताना जरांगे भावनिक झाले. त्यांनी सांगितले, "आमच्या उभ्या पिढ्यांचे वाटोळे झाले. आज प्रत्येक घरात बेरोजगारी आहे. माझ्या लेकराबाळांचा प्रश्न आहे. म्हणूनच मला मुंबईला यायचं आहे. तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर आम्ही मंत्रालयावर गुलाल उधळू. पण हिंसा करणार नाही. दगडफेक, जाळपोळ टाळा," असे आवाहन त्यांनी बांधवांना केले.
मराठा बांधवांची तयारी
मनोज जरांगे पाटील सध्या दौऱ्यावर असून, प्रत्येक ठिकाणी ते समाजाला मोठ्या संख्येने मुंबईत एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत. त्यामुळे 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा बांधवांचा प्रचंड जनसागर जमण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. "आम्ही शांततेत मागणी करतोय, पण जर आमच्या पोरांना छेडलं तर आम्ही गप्प बसणार नाही," असा इशारा देऊन जरांगे यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे.