AIMIM : भाजपच्या त्सुनामीत ओवेसींचा झेंडा फडकला, राज ठाकरेंपेक्षा अधिक प्रभावी कामगिरी

AIMIM : भाजपच्या त्सुनामीत ओवेसींचा झेंडा फडकला, राज ठाकरेंपेक्षा अधिक प्रभावी कामगिरी

महाराष्ट्रातील २०२६ च्या महानगरपालिका निवडणुकांत भाजपने मोठी आघाडी घेत राज्याच्या शहरी राजकारणावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले असले
Published by :
Varsha Bhasmare
Published on

महाराष्ट्रातील २०२६ च्या महानगरपालिका निवडणुकांत भाजपने मोठी आघाडी घेत राज्याच्या शहरी राजकारणावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले असले, तरी या ‘भाजप सुनामीत’ एक नाव ठळकपणे समोर आले आहे—ते म्हणजे असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एआयएमआयएम. राज्यातील २९ महानगरपालिकांमधील एकूण २,८६९ जागांपैकी एआयएमआयएमने तब्बल ७५ जागांवर विजय मिळवला किंवा आघाडी घेतली आहे. ही कामगिरी केवळ संख्यात्मकदृष्ट्या नव्हे, तर राजकीय प्रभावाच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे.

मुंबई महानगरपालिकेत एआयएमआयएमने तीन जागांवर विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुंबईत मुस्लिम मतदारांचे प्रमाण २० टक्क्यांहून अधिक असले, तरी आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचाच या मतांवर प्रभाव राहिला होता. मात्र, ओवेसींनी मुस्लिमबहुल वॉर्डमध्ये उमेदवार उभे करून काँग्रेस-राष्ट्रवादीचे गणित बिघडवले. वॉर्ड क्रमांक १३५ मधून इर्शाद खान, १३४ मधून मेहजबीन अतिक अहमद आणि १४५ मधून खैरुन्निसा हुसेन यांनी विजय मिळवला.

एआयएमआयएमची सर्वाधिक प्रभावी कामगिरी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महानगरपालिकेत पाहायला मिळाली. येथे एकूण ११५ जागांपैकी पक्षाने २४ जागांवर विजय मिळवला किंवा आघाडी घेतली आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांचा प्रभाव आणि मजबूत संघटनात्मक बांधणी यामुळे एआयएमआयएम मराठवाड्यातील प्रमुख शहरी राजकीय शक्ती म्हणून उदयास आली आहे.

मुस्लिमबहुल मालेगावमध्ये ओवेसींच्या पक्षाने ‘किंगमेकर’ची भूमिका बजावली आहे. मालेगाव महानगरपालिकेतील ८४ जागांपैकी एआयएमआयएम २० जागांवर आघाडीवर आहे. भाजप केवळ २, शिंदे गट १८ आणि काँग्रेस फक्त ३ जागांवर आघाडीवर असल्याने एआयएमआयएमशिवाय महापौर निवड अशक्य असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मालेगावमध्ये ओवेसींचे महत्त्व निर्णायक ठरणार आहे. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत एआयएमआयएमने १४ जागांवर आघाडी घेत सर्वांनाच धक्का दिला आहे. धुळ्यात १०, अमरावतीत ७, जालन्यात २ आणि परभणीत १ जागेवर पक्षाने विजय मिळवला आहे. चंद्रपूरमध्ये एमआयएमचा पहिला नगरसेवक निवडून येणेही प्रतीकात्मकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, हे यश एआयएमआयएमच्या मर्यादित मुस्लिम मतांच्या पलीकडे जात शहरी राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न दर्शवते. एकूणच, भाजपच्या वर्चस्वाच्या काळातही ओवेसींच्या पक्षाने आपली जागा ठामपणे निर्माण करत महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा घटक म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com