Pahalgam Terror Attack : आता पाकिस्तानमधील टपाल, पार्सल देवाणघेवाणीवरही बंदी; दळणवळण मंत्रालयाचा निर्णय
भारताने (India) पाकिस्तानची (Pakistan) पुन्हा एकदा कोंडी केली आहे. त्यांनी पाकिस्तानसोबतच्या पत्रव्यवहारावरही बंदी घातली आहे. केंद्राच्या दळणवळण मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून भारत सरकारने पाकिस्तानमधून हवाई आणि भूपृष्ठ मार्गाने येणाऱ्या सर्व प्रकारच्या टपाल आणि पार्सलची (parcels) देवाणघेवाण स्थगित केली आहे. सोबतच पाकिस्तानच्या सर्व प्रकारच्या जहाजांवरही भारताने बंदी घातली असून केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय मानला जात आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पाकिस्तानच्या विरोधात कठोर निर्णय घेण्यास सुरूवात केली. यामध्ये सिंधू पाणी करार स्थगित केला, तर वस्तूंवरील आयात-निर्यातींवरही बंदी घालण्यात आली. पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत भारत देश सोडून जाण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पाकिस्तानी कलाकार आणि क्रिकेटर्सच्या इन्स्टा अकाऊंटवर भारतात बंदी घातली. आता पाकिस्तानसोबतच्या टपाल आणि पार्सल सेवांच्या देवाण-घेवाणीवरही स्थगिती आणण्यात आली आहे.