WCL 2025 Semifinal : क्रिकेटपेक्षा राष्ट्र प्रथम! भारताचा पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय

WCL 2025 Semifinal : क्रिकेटपेक्षा राष्ट्र प्रथम! भारताचा पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (WCL) क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धचा उपांत्य सामना खेळण्यास नकार दिल्यानंतर स्पर्धेतून माघार घेतली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (WCL) क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धचा उपांत्य सामना खेळण्यास नकार दिल्यानंतर स्पर्धेतून माघार घेतली आहे. या निर्णयामुळे आता पाकिस्तानचा संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे.

या स्पर्धेत भारताचा संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. शिखर धवन, युवराज सिंग, इरफान पठाण, हरभजन सिंग, सुरेश रैना यांसारख्या माजी क्रिकेटपटूंनी यंदाच्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. मंगळवारी झालेल्या अखेरच्या गटसामन्यात भारताने वेस्ट इंडीजविरुद्ध दमदार विजय मिळवत अंतिम चारमध्ये प्रवेश केला होता.

मात्र, पाहलगाम परिसरात घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळणे टाळण्याचा निर्णय घेतला. या हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ नावाची कारवाई हाती घेतली होती. त्यानंतर भारताचा संघ अशा देशाविरुद्ध खेळण्यास इच्छुक नसल्याचं स्पष्ट केलं.

स्पर्धेचे आयोजक WCL यांनी अधिकृत निवेदनाद्वारे भारताच्या निर्णयाचा आदर केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, "खेळामुळे सामाजिक परिवर्तन शक्य असलं, तरी जनतेच्या भावना अधिक महत्त्वाच्या आहेत. भारताचा निर्णय आम्ही समजून घेतला असून, पाकिस्तान संघाची स्पर्धेसाठी तयारीही आम्ही मान्य करतो."

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना EaseMyTrip या मुख्य प्रायोजक कंपनीनेही भारताच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. कंपनीचे सह-संस्थापक निशांत पिट्टी यांनी समाजमाध्यमांवर लिहिलं की, "क्रिकेट आणि दहशतवाद यांना एकत्र स्थान नाही. देशाच्या विरोधात हिंसा करणाऱ्या देशाविरुद्ध खेळणं म्हणजे राष्ट्रहिताविरुद्ध जाणं ठरेल. EaseMyTrip अशा कोणत्याही सामन्याशी संबंधित राहणार नाही."

भारताने गट टप्प्यातही पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला होता. त्यावेळी काही प्रमुख खेळाडूंनी संघातून माघार घेतली होती. गुरुवारी एडबॅस्टन येथे होणारा उपांत्य सामना रद्द झाला असून, पाकिस्तान संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल.

हेही वाचा

WCL 2025 Semifinal : क्रिकेटपेक्षा राष्ट्र प्रथम! भारताचा पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय
Impact of US Tariffs on Indian Economy : ट्रम्पच्या नव्या टॅरिफचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम; रुपयामध्ये सुधारणा, RBI हस्तक्षेपाची शक्यता
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com