T20 Series : भारताच्या पोरी हुश्शार...टी-२० वर्ल्डकपआधी रचला इतिहास, बांगलादेशचा ५-० ने उडवला धुव्वा
India Womens Vs Bangladesh Womens : बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडियाने बांगलादेश महिला क्रिकेट संघाविरोधात झालेल्या टी-२० मालिकेत ५-० ने दणदणीत विजय मिळवला. या मालिकेतील अखेरचा सामना सिलहेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. पहिल्या चार सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचं लक्ष बांगलादेशला क्लीन स्वीप करण्याकडे होतं. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करून बांगलादेशला १५७ धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर प्रत्युत्तरात बांगलादेशच्या संघाची पुरती दमछाक उडाली. कारण बांगलादेशला निर्धारित षटकांमध्ये ६ विकेट्स गमावून १३५ धावाच करता आल्या. त्यामुळे बांगलादेशचा या सामन्यात २१ धावांनी पराभव झाला.
हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माने २५ धावांची मोठी भागिदारी केली. तर दुसऱ्या विकेटसाठी डायलन हेमलताने मंधाना सोबत ३७ धावा केल्या. शेफाली वर्माने १४ आणि मंधानाने ३३ धावांचं योगदान दिलं. हेमलतानेही सर्वाधिक ३७ धावा केल्या. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने महत्त्वपूर्ण ३० धावा केल्या. रिचा घोषने २८ धावा केल्या. बांगलादेशसाठी राबेया खान आणि नाहिदा अक्तरने २-२ विकेट घेतल्या.
१५७ धावांचं लक्ष्य गाठताना बांगलादेशची सुरवात खराब झाली. सोभना मेस्त्री १३ आणि दिलारा अख्तर ४ धावा करून बाद झाली. रुबया हैदरने २० धावांची मह्त्त्वपूर्ण खेळी केली. तर कर्णधार निगार सुल्ताना अवघ्या ७ धावा करून तंबुत परतली. बांगलादेशने ५२ धावांवर ५ विकेट्स गमावले होते. त्यावेळी ऋतू मोनी आणि शोफिया खातूनने ५७ धावांची भागिदारी रचली. ऋतुने ३७ धावांची खेळी केली. तर शेवटच्या षटकांमध्ये शोफियाने २८ आणि राबेया ११ धावांची नाबाद खेळी केली. टीम इंडियासाठी राधा यादवने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. या मालिकेत राधा यादवने १० विकेट्स घेतल्यानं तिला प्लेयर ऑफ द सीरिजचा किताब देण्यात आला.