India Pakistan War : 'भारताचा दृष्टिकोन संयमी आणि जबाबदारीचा, तो तसाच राहील'; एस. जयशंकर यांनी अमेरिकेला केलं स्पष्ट
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी सैन्य सीमेवर वारंवार गोळीबार करत आहे आणि नागरिकांना लक्ष्य करत आहे. ९ मे ते १० मेच्या मध्यरात्री, पाकिस्तानी सैन्याने ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांचा वापर करून भारतीय लष्करी तळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी ठरला. भारतीय सैन्याने बहुतेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेत पाडले आहेत. अशा परिस्थितीत हे प्रकरण आता तापत आहे. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी संवाद साधला आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी आज, शनिवारी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. यानंतर एस. जयशंकर यांनी 'एक्स'वर एक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी नमूद केले की, "आज सकाळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी चर्चा झाली. दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी चर्चा सुरू करावी, असे रुबियो यांनी म्हटले आहे. भारताचा दृष्टिकोन नेहमीच संयमी आणि जबाबदार राहिला आहे आणि तो तसाच राहील." मार्को रुबियो यांनी यापूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याशी चर्चा केली होती. या वादाबद्दल अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, त्यांना हा वाद लवकरात लवकर सोडवायचा आहे.