Pahalgam Terror Attack : आयुध निर्माणीतील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या अनिश्चित काळासाठी रद्द
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी सामान्य नागरिकांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 26 निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तान जबाबदार असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. दळणवळण, उत्पादनांची आयात तसेच डिजिटल स्ट्राइक असे अनेक कठोर निर्णय घेतले गेले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी भारतीय सैन्याला सूट दिली आहे.
अशातच आता भारतीय सैन्याबद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भारत पाक यांच्यामध्ये असलेल्या युद्धजन्य परिस्थितिमुळे देशातील आयुध निर्माण करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या अनियमित काळासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. याबद्दलची माहिती भद्रावती आयुध निर्माणमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
भारत पाकिस्तान यांच्यामधील तणावजन्य परिस्थितीमध्ये भारताच्या संरक्षण मंत्रालयाने देशातील आयुध निर्माण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. सुरु आठवड्यापासून सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून अनिश्चित काळासाठी असल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीरमध्ये होत असलेल्या विकासामुळे नाराज झालेल्या पाकिस्तानने दहशतवादी हल्ल्याचा कट रचला, अशी माहिती काश्मीरमधील अधिकाऱ्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काश्मीर दौऱ्याची नवी तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.