"...तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे १८० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील", जयंत पाटील यांचं मोठं विधान
Jayant Patil Press Conference : महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पवार साहेबांसाठी प्रयत्नांची शिकस्त केली. आमच्या मित्रपक्षानेही आम्हाला सहकार्य केलं. त्यामुळे आम्हाला घवघवीत यश मिळालं. आमच्या पक्षाचा ८० टक्के स्ट्राईक रेट दिसून येतो. आम्ही दोन जागा जास्त लढवल्या असत्या तर संख्या वाढली असती. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं टीम वर्क चांगलं सुरु आहे. तिन्ही पक्षामध्ये सामंजस्य आहे. त्यामुळे आम्ही पुढील विधानसभा निवडणुकीत एकसंधपणे लढलो, तर महाराष्ट्रात आमचे १८० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील. याची आम्हाला खात्री आहे. कारण आता महाराष्ट्राचं वातावरण तसं आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
पत्रकार परिषदेत जयंत पाटील म्हणाले, महागाई देशात प्रचंड वाढलेली आहे. जीएसटीच्या वाढती टक्केवारीचा लोकांना फटका बसला आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कारभाराला लोकं त्रस्त झाली होती. महाराष्ट्रातली जनता या राज्यकारभाला प्रचंड कंटाळलेली आहे. मोदींच्या कारभाराचा जनतेनं हा अभिप्राय दिला आहे. महाराष्ट्रात दोन पक्ष फोडून राज्य कोणत्याही परिस्थितीत आणलं. या सर्व गोष्टी महाराष्ट्राच्या मनाला लागलेल्या आहेत. त्याचा परिणाम विधानसभेत दिसेल, अशी मला खात्री आहे.
मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली, यावर बोलताना पाटील म्हणाले, फणडवीसांना लोकसभेसाठी पार्ट टाईम काम केलं नाही. त्यांनी पूर्णवेळ दिलेला आहे. ते त्यांचं मत आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी वरिष्ठांनी सांगितलं होतं. त्यामुळे फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं, याचं दु:ख त्यांच्या मनात कायम होतं का, या प्रश्नाचं उत्तर देताना पाटील म्हणाले, ते उपमुख्यमंत्री झाल्यावर व्यवस्थित काम करत होते. त्यामुळे त्यांच्या मनात नव्हतं, असं आपण कसं म्हणणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कदाचित अट घातली असेल की, मला मुख्यमंत्री व्हायचंय. यांनी एक पाऊल मागे उतरून उपमुख्यमंत्री व्हायची तयारी दर्शवली असेल. त्यांचा कारभार तर व्यवस्थीत चालू आहे.