Jayant Patil : जयंत पाटील यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; पत्रात काय?

Jayant Patil : जयंत पाटील यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; पत्रात काय?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी लिहिलं आहे की, '25 एप्रिल 2025 रोजी दिग्दर्शक अनंत महादेवन यांचा फुले' हा चित्रपट जगभरात प्रसिद्ध झाला असून प्रेक्षकांची मोठी पसंती या चित्रपटाला मिळत आहे. हा चित्रपट अधिकाधिक लोकांना पहायला मिळावा म्हणून टॅक्स फ्री करण्यात यावा अशी आमची मागणी आहे.'

'महोदय, दलितांना पाण्याचा हौद खुला केला, शिक्षणासाठी दारे उघडे केली, स्त्री शिक्षणासाठी पाऊल टाकले इतकाच मर्यादित महात्मा फुले आणि सावित्रीमाईंचा इतिहास नाही तर त्याहूनही व्यापक काम महात्मा फुले आणि सावित्रीमाईंनी करून ठेवले आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव इतका अफाट आहे की जसा १९ व्या शतकात त्यांच्या कार्याला विरोध केला गेला तितकाच विरोध २१ व्या शतकात त्यांच्या चित्रपटाला झाला. परिणामी चित्रपटातील जवळपास १२ सोन्स सेन्सॉर बोर्डाने कापले. परंतु महात्मा ज्योतिबा फूले आणि सावित्रीमाईंचे विचार तोकडे पडले नाहीत.'

यासोबतच ते पुढे म्हणाले की, 'माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्यासाठी लढणाऱ्या जोडप्याचा हा संपूर्ण प्रवास प्रत्येकाने पाहायला हवा. त्यांच्याविषयी अपप्रचार करणाऱ्या जबाबदार व्यक्तींना सुद्धा हा चित्रपट आवर्जून दाखवावा. त्यामुळे अनेक गैरसमज दूर होतील. या चित्रपटातून आपल्याला समाज उन्नतीसाठी उभारलेल्या चळवळीचा जिवंत इतिहास पहायला मिळेल. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की "फूले चित्रपट टॅक्स फ्री करत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, परिवर्तनवादी, पुरोगामी महाराष्ट्र घडवणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान झाला पाहिजे. आपल्या गौरवशाली इतिहासाचा ठसा प्रत्येकाच्या मनात उमटला पाहिजे.' असे जयंत पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com